आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द, मग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

| Updated on: Oct 22, 2020 | 8:49 AM

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. तसंच या बैठकीनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असं आश्वासनही बाळासाहेब थोरात यांनी दिलं होतं. पण आज होणारी मंत्रिमंडळ बैठकच रद्द करण्यात आली आहे.

आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द, मग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?
Follow us on

मुंबई: राज्यात अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. पण आज होणारी बैठकच रद्द करण्यात आल्याची माहिती मिळतेय. उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपलब्ध नसल्यानं ही बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय होईल अशी माहिती दिली होती. मात्र ही बैठकच रद्द करण्यात आल्यानं आता शेतकऱ्यांना कधी दिलासा मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. (Mumbai todays state cabinet meeting cancel)

उपमुख्यमंत्री अजित पवार उपलब्ध नसल्यामुळं आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्यामुळं ते गेल्या काही दिवसांत कामकाजापासून दूर आहेत.  त्यामुळे अजित पवार यांनी आपले खासगी कार्यक्रम आणि जनता दरबारही रद्द केला होता. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही आहेत. त्यामुळे या बैठकीला त्यांची उपस्थिती गरजेची आहे.  मात्र, उद्या मंत्रिमंडळाची बैठक नक्की होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज शेतकऱ्यांना मिळणार होता मोठा दिलासा!

‘अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. तर काल मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. हा दौरा झाल्यानंतर गुरुवारी म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत याविषयावर चर्चा करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाईल’, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी tv9 मराठीला दिली होती. मुख्यमंत्री सोलापूर आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना बाळासाहेब थोरातही त्यांच्यासोबत होते.

दरम्यान, केंद्र सरकारनंही राज्याला मदत द्यायला हवी. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे 30 हजार कोटी रुपये बाकी आहेत. ते केंद्रानं राज्याला द्यावे, अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची tv9 ला माहिती

केंद्राने आधी राज्याच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत; बाळासाहेब थोरातांची मागणी

Mumbai todays state cabinet meeting cancel