Skin Care in Monsoon: ‘या’ तीन चुकांमुळे पावसाळ्यात होतो पिंपल्सचा त्रास; त्वचेची घ्या अशी काळजी

| Updated on: Jul 29, 2022 | 3:22 PM

पावसाळ्यात ओलावा वाढल्याने त्वचेचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या दिवसात त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. थोडेसेही दुर्लक्ष झाल्यास त्रास वाढू शकतो.

Skin Care in Monsoon: या तीन चुकांमुळे पावसाळ्यात होतो पिंपल्सचा त्रास; त्वचेची घ्या अशी काळजी
Image Credit source: Tv9
Follow us on

पावसाळ्याच्या दिवसात (Monsoon season) केवळ आपली तब्येत लवकर खराब होत नाही, तर त्वचाही आजारी पडू शकते. या ऋतूमध्ये ओलावा वाढल्याने आपली त्वचा जास्त तेलकट (oily skin) होते. त्यामुळे त्वचेवर विशेषत: चेहेऱ्यावर मुरुमे ( पिंपल्स) आणि ब्लॅकहेड्सची समस्या वाढते. त्याशिवाय बऱ्याच वेळा त्वचेचा रंगही फिकटतो, ज्यामुळे चेहेऱ्यावरील चमक, ग्लो गायब होतो. सौंदर्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळा आपण केलेल्या चुकाही त्वचेच्या त्रासासाठी कारणीभूत ठरू शकतात. पावसाळ्याच्या दिवसातही तुम्हाला हेल्दी आणि चमकदार, ग्लोइंग त्वचा हवी असेल तर काही चुका टाळणे गरजेचे आहे. काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास व त्वचेची नीट काळजी (skin care) घेतल्यास पावसाळ्यातही त्वचा चमकदार दिसेल.

जास्त मेकअप करू नका –

पावसाळ्याच्या दिवसात जास्त मेकअप करणे टाळावे. या ऋतूत पाणी आणि ओलाव्यामुळे सतत चिपचिप होत असते. त्यातच मेकअप करण्यासाठी वापरण्यात येणारी सौंदर्य प्रसाधने तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन ती बंद करू शकतात. छिद्र बंद झाल्यास त्वचेमधून जास्त तेल निघतं . आणि त्यामुळे चेहेऱ्यावर मुरुमे आणि फोड येऊ शकतात, तसेच डागही पडू शकतात. चेहऱ्याचा रंगही फिकटतो. त्यामुळे पावसाळ्यात मेकअप करणे टाळावे, अगदीच गरज असल्यास शक्य तितका हलका मेकअप करावा.

चेहऱ्याची नीट स्वच्छता न करणे –

त्वचा नीट स्वच्छ न करणे हेही मुरुमांसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स अधिक वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तर या गोष्टीची जास्त काळजी घेतली पाहिजे. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा क्लीन्झिंग मिल्कने स्वच्छ करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील धुळीचे कण, अथवा इतर घाण निघून जाते. त्यानंतर चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून हलक्या हाताने टिपून घ्यावा.

हे सुद्धा वाचा

मॉइश्चरायजर न वापरणे –

पावसाळयात त्वचा तेलकट होत असल्यामुळे अनेक जण मॉइश्चरायझरचा वापर करत नाहीत. मात्र हीच त्यांची मोठी चूक ठरते. पावसाळ्यातील वाढत्या आर्द्रतेचा तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते आणि तिची चमक कमी होते. त्यामुळेच आपल्या त्वचेचा पोत कसा आहे त्यानुसार, पावसाळ्यातही मॉइश्चरायझर जरूर वापरले पाहिजे.

या गोष्टीही ठेवा लक्षात –

पावसाळ्यात हवेतील ओलावा वाढल्याने त्वचेची नेहमीपेक्षाा अधिक काळजी घेणे आवश्य आहे. त्यामुळे या ऋतूत आठवड्यातून किमान दोन दिवस तरी त्वचा एक्सफोलिएट जरूर करा. त्यामुळे त्वचेचं डीप क्लीन्झिंग होते आणि बॅक्टेरिया व घाणीपासून त्वचेचं संरक्षणही होतं. त्याशिवाय त्वचेसाठी नॉन अल्कोहोलिक प्रॉडक्ट्सचा वापर करावा. त्यामुळे स्किन टोन आणि पीएच संतुलन कायम राहते.