औरंगाबादः शहरातील रस्ते, वीज, पाणी, करांबाबत नागरिकांच्या मनात कोणतेही प्रश्न असतील किंवा काही तक्रारी असतील तर औरंगाबादकरांना मनपाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण महापालिका (Aurangabad Municipal Corporation) लवकरच नागरिकांसाठी एक हेल्पलाइन सुरु करणार आहे. मनपा कार्यपद्धतीसंबंधित प्रश्नांसाठी आणि सेवेसंबंधीत मदतीसाठी 24 तास हेल्पलाइन सुरु केली जाईल. हा उपक्रम स्मार्ट सिटीच्या (Smart City) इ गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी चे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी ने नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे इ गव्हर्नन्स प्रकल्प घेतला आहे. ह्या प्रकल्पाद्वारे सेवेचा अधिकार अधिनियम अंतर्गत मनपा संबधित सर्व सेवा नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कार्यक्षमरित्या उपलब्ध केली जाईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा हेल्पलाइनचा नंबर जाहीर केला जाईल, अशी माहिती स्मार्टी सिटीच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
लवकरच स्मार्ट सिटीतर्फे ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. नागरिकांना मनपाकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवेंबद्दल काही प्रश्न असतील किंवा मदतीची गरज असेल तर लवकरच स्मार्ट सिटी कडून त्याचसाठी एक हेल्पलाईन नंबर जाहीर केला जाईल. स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगितले. “या लाईन वर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे संबधित प्रश्नांसाठी व मदतीसाठी कॉल करू शकतील,” फैज अली यांनी सांगितले.
मनपाच्या सेवा किंवा पद्धतीविषयी शंका, प्रश्न असलेल्यांनी कॉल केल्यास मनपा प्रतिनिधी नागरिकांचे प्रश्न किंवा समस्येची ऑनलाइन नोंद करून घेतली जाईल. संबंधित प्रश्नाचं लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच या शंकेचं लगेच निवारण होत नसेल तर संबधित विभागाच्या कर्मचाऱ्याला यासाठी नेमण्यात येईल. ठराविक वेळेवर निवारण होत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती समस्या जाईल. ह्या हेल्पलाईनचं संचालन स्मार्ट सिटीचे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर करेल. स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्या देखरेखीखाली विकसित करण्यात येणाऱ्या हेल्पलाईनद्वारे मनपा आयुक्तांना लाईव्ह माहिती मिळेल. ही हेल्पलाईन जूनच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च केली जाणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी कर्यालयाकडून देण्यात आली.