गिरीश महाजन दबक्या आवाजात मनोज जरांगे यांना काय म्हणाले? आश्वासन काय?

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. पुढील रणनीती ठरवण्यासाठी जरांगे पाटील यांनी उद्या 17 तारखेला महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जरांगे यांनी वेळ वाढवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गिरीश महाजन दबक्या आवाजात मनोज जरांगे यांना काय म्हणाले? आश्वासन काय?
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 16, 2023 | 8:57 PM

संभाजीनगर | 16 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणाची डेडलाईन जवळ आली आहे. त्यामुळे सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करू नये म्हणून राज्य सरकारने आतापासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची संभाजीनगरातील गॅलक्सी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी मीडियासमोरच तिघाची चर्चा झाली. गिरीश महाजन यांनी जरांगे यांना सरकारने काय काय काम केलं याची माहिती दिली. तसेच तुम्ही आमच्या केसेस मागे घ्या, अशी मागणी लावून धरत जरांगे यांनी महाजन यांची कोंडी केली. यावेळी महाजन यांनी जरांगे यांना दबक्या आवाजात आश्वासन दिलं. महिनाभरात मागासवर्ग आयोगाचा अहवाल येणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे, असं महाजन यांनी सांगितलं.

मनोज जरांगे आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद

मनोज जरांगे – आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणेच चर्चा आहे ना?

गिरीश महाजन – आपलं ठरल्याप्रमाणे सुरू आहे. तुम्ही सॅटिसफाईड आहात. लोकं सर्व कामाला लागले आहेत. जिल्हाधिकारी कामाला लागले आहेत. शिंदे समिती कामाला लागली आहे. 30 ते 40 लाख नोंदी तपासत आहेत. त्यात काही दूमत नाही म्हणावं. विधानसभेत चर्चा झाली. सर्व आमदार आरक्षणावर बोलत आहेत. अडचणी काय आहे तुम्हाला माहीत आहे. क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून कोर्टात सुनावणी सुरू आहे. तुम्ही बघत आहात. मागासवर्ग आयोग नेमून दुसरं ऑप्शन ठेवलं आहे. मागच्या ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या दूर केल्या जाणार आहे. हा समाज मागास कसा आहे, हे दाखवणार आहोत. मागच्यावेळी एक दोन माणसांना विचारलं होतं. असं करून चालणार नाही. समाज खूपच पुढारलेला आहे की काय असं झालं.

समाजात उस तोडणी कामगार आहे. घरकाम करणाऱ्या महिला आहेत. मजूर आहेत. डबेवाले आहेत, आत्महत्या केवढ्या होत्या हे बघितलं नाही. म्हणजे त्यावेळी मांडता आलं नाही. आता आपण ते सर्व तपासत आहोत. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा झाला आहे. तुम्हाला माहीत आहे. आम्ही ते करत आहोत. शासन गप्प बसलंय असं नाही. काही करत नाही असा भाग नाही. तुम्हाला याची कल्पना आहे सगळी (दबक्या आवाजात काय बोलले)

आपण काय काय केलं ते सर्व आणलंय. या कागदात सर्व आहे. शासन काय करतंय, समिती काय करतेय सर्व त्यात आहे. पाच पाच सहा सहा हजार कोटीचं कर्ज दिलंय. काय काय केलं आहे. हे मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधा आहेतच आपल्याकडे.

जरांगे – मी ही कागदपत्रे निवांत वाचतो.

महाजन – निवांत वाचा हरकत नाही.

महाजन – मुख्यमंत्र्यांनी स्वत: सांगितलं आपल्याला द्यायचंच आहे. देत नाही असं नाही. फक्त आपली सरकारी पद्धत आहे, सर्व गोष्टी पाहून कराव्या लागतात. आपल्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे. आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे. क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून होणारच आहे. तुमच्यामुळे ते इतक्या टोकाला आलं आहे. इतकी आंदोलनं झाली. देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. पण त्यानंतर तुम्ही सांगितल्यानंतर इतक्या झपाट्याने केलंय. आता फक्त थोडं सबुरीने घेतलं तर बरं होईल. आरक्षण अंतिम टप्प्यातच आहे.

जरांगे – सबुरीनेच घेत आहे. मामा (संदीपान भुमरेंना उद्देशून) बरोबर ना. तीन महिने दिले होते. नंतर 40 दिवस दिले.

महाजन – पण नियमानेच करावे लागणार ना. कायद्यानेच करण्यासाठी करायचं आहे ना. मागच्यावेळी ज्या क्युरी निघाल्या होत्या. त्या दुरुस्त करत आहोत.

जरांगे – आम्ही वेळ दिला. तुमच्या शब्दाला जागलो.

संदीपान भुमरे – जे होणार तुमच्यामुळेच होणार आहे.

महाजन – आम्ही थांबलोय का? इतक्या वेगाने पहिल्यांदाच काम होत आहे. स्पीडने करत आहोत.

जरांगे – सर्व समाज म्हणतोय सरकारने वेगाने काम केलं. आम्ही हट्टीपणा केला नाही. सुरुवातीला आम्ही हट्टीपणा केला. पण आमच्यात माणुसकी आहे.

महाजन – आपण वेगाने करत आहोत. तुमच्यामुळेच होत आहे. टिकणारंच आरक्षण देणार आहोत.

जरांगे – आधी नाही म्हणत होते. आता नोंदी होत आहे. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. जे ठरलं तेच करा. मराठा समाज तुमच्या सोबत राहील.

महाजन – क्युरेटिव्ह पिटीशनने सर्वांनाच मिळेल.

जरांगे – समाज आणि तुम्हीही समाधानी आहात. तीन विषयावर ठरलं. ते केलं तर तुम्हीही मोकळे व्हाल. चार भिंतीच्या आत केली तरी चर्चा आणि समाजासमोर झाली तरी चर्चाच. काय काय करायचं हे मागच्या मिटिंगमध्ये काटछाट करून ठरलं आहे.

महाजन – आम्ही सरकार म्हणून कुठे कमी आहोत का? आम्ही वेगाने करत आहोत.

जरांगे – केसेस मागे घेण्यात तुम्ही मागे आहात. ते करा. चिल्लर गोष्ट आहे

महाजन – आम्ही ते करत आहोत. बीडचं थोडं आहे. पण आम्ही केसेस काढून टाकू. देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे.

जरांगे – आमच्याशी धोका झाला. आमच्या लोकांना अटक केली. विनाकारण तिघांना उचलून नेलं. तुम्हाला कचाट्यात पकडत नाही. भाऊ, आम्हाला तिथे फटका बसला. बीडच्या घटनेचं समर्थन करत नाही. अंतरवलीतील घटनेतील लोकांच्या केसेस मागे घेतल्या नाही. आज अंतरवलीतील काही लोकांना नोटीस गेल्यात.

जरांगे – ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली त्यांच्याविरोधात एफआयआर घ्या. आमच्यावर केसेस करता तर तुमच्यावरही घ्या. एफआयआर करू शकत नाही, असा काही कायदा आहे का? अंतरवलीत आज पुन्हा नोटीस आली. तीन महिन्यापूर्वी आश्वासन दिलं. तरी नोटीस बजावल्या. प्रकाश सोळंके यांनी सांगितल्यानंतर काही लोकांना उचललं जात आहे. हे काय चाललंय. मीडियासमोर तुम्ही हो हो म्हणता आणि जे करायचं तेच करत आहात. म्हणून आम्हाला वाटतं आम्ही आपल्या स्पीडने पुढे गेलं पाहिजे.

जरांगे – तुमचा 24 तारखेचा वेळ कपात केला नाही. करणार नाही. फक्त 17 तारखेला बैठक ठेवली आहे.

महाजन – काम वेगाने सुरू आहे. अंतिम टप्प्यात आहे. आम्ही काही लपवून ठेवत नाही.

जरांगे – केसेसमध्ये आम्हाला दगाफटका झाला. आरक्षणात का होणार नाही. अधिकृत किती नोंदी सापडल्या. हे तुमच्याकडून आलं नाही. ते तुम्ही आज पहिल्यांदाच सांगितलं.

महाजन- आम्ही विधानसभेत सांगितलं. आता 18 तारखेला सभागृहात चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देणार आहे. त्यावेळी सर्व गोष्टी समोर येणार आहेत.

महाजन – तुम्ही 24 तारीखच धरून ठेवली आहे. थोडं मागे पुढे होतं.

जरांगे – आम्ही तुमच्याशी भांडतो त्याचं कारण तुम्ही देणारे आहात. नाही तर आमचं तुमच्याशी शत्रूत्व नाहीये. तुम्ही केसेसमध्ये अडकवत आहात.

महाजन – तुम्ही मुख्य विषयाकडे लक्ष द्या. आपण त्यात मार्ग काढतोय.

जरांगे – ठरावीक लोकांचीच बैठक बोलावली आहे. त्यात मी माझं मत मांडेल. आम्ही ताणलं हे मान्य करतो. पण त्याशिवाय काम पुढे जात नाही. हट्ट धरला नसता तर 54 लाख नोंदी मिळाल्याच नसत्या. आज कुणाच्या तरी घरात आरक्षणामुळे भाकर गेली.

महाजन – आपल्याला आरक्षण पाहिजे हे नक्की. आम्ही दिलं होतं. पण राजकारणाचं बोलायचं नाही. सर्वोच्च न्यायालयात जोर लावला असता तर झालं असतं. आता पुन्हा क्युरेटिव्हच्या माध्यमातून करत आहे. मार्ग निघेल.

महाजन- दोन्ही पर्याय आहेत. आयोगाच्या माध्यमातून लगेच महिन्याभरात सेशन घेऊन जाहीर करू. तोही मार्ग सोपा आहे. (दबक्या आवाजात)

महाजन – आता बघा अण्णा हजारेंचंच उदाहरण घ्या. काल ते इतके खूष होते. त्यांनी इतके फोन केले. शेवटी आपण त्यांचा लोकपालाचा मुद्दा मार्गी लावला ना. थोडं लेट झालं. 10 ते 12 वर्षाचा लढा होता. पण झालं. तेव्हा विधानसभेत बहुमत नव्हतं. आता बहुमत होतं. अण्णाचा आग्रह होता त्यामुळे मुद्दा मार्गी लावला.

जरांगे – आयोगाचं काम सुरू आहे का?

महाजन – आयोगाचं काम सुरूच आहे. फुलफ्लेजमध्ये सुरू आहे. या तुम्ही चर्चा करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us