यंदा बाजारात रेखीव बैलजोडी, शिंगही नाजूक पण मजबूत, मागील वर्षी घरी नेईपर्यंत शिंग तुटल्याची ग्राहकांची होती तक्रार

| Updated on: Sep 03, 2021 | 9:04 PM

आधी साच्याद्वारे बैलाची मूर्ती तयार केली जाते. ती वाळल्यानंतर त्यावर कलर गनने रंग दिला जातो. त्यानंतरच एवढी सुबक बैलजोडी बाजारात दिसू लागते. दीड लाखांची गुंतवणूक केल्यावर तीस-चाळीस हजार रुपयांचा नफा होतो.

यंदा बाजारात रेखीव बैलजोडी, शिंगही नाजूक पण मजबूत, मागील वर्षी घरी नेईपर्यंत शिंग तुटल्याची ग्राहकांची होती तक्रार
औरंगाबादच्या बाजारात यंदा अशाअत्यंत रेखीव बैलजोड्या दाखल झाल्या आहेत.
Follow us on

औरंगाबाद: श्रावण महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा बैलपोळा सण जवळ येत असताना औरंगाबाद शहरातील बाजारातही प्रतीक म्हणून पूजल्या जाणाऱ्या बैलजोड्या विक्रीसाठी आल्या आहेत. मागील वर्षी कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने बैलपोळ्याच्या सणावर विरजण पडले होते. यंदा मात्र लॉकडाऊनचे(Lockdown Rules)  निर्बंध शिथिल झाल्याने बाजारातही नवचैतन्य दिसत आहे. गणपतीच्या आगमनापूर्वी येणाऱ्या बैलपोळा सणासाठीही बाजारात विविध प्रकारच्या मातीच्या आणि पीओपीच्या बैलजोड्या आल्या आहेत.

आधुनिक साच्यातील रेखीव बैलजोडी

शहरातील सुपारी हनुमान भागातील बैलजोडी तयार करणाऱ्या रेखाताईंनी सांगितले की, मागच्या काही पिढ्यांपासून आमच्या घरात बैलजोडी तयार केल्या जातात. मात्र गेली दोन वर्षे काहीच धंदा झाला नाही. यंदा मात्र आम्ही उत्साही आहोत. बैल तयार करण्यासाठीचे साचे दरवर्षी बदलतात. त्यात काहीतरी नवा बदल झालेला असतो. त्यानुसार आम्ही मुंबईहून ते साचे आणतो. यंदाही अत्यंत रेखीव, सुबक अशी बैलजोडी तयार करणारे साचे आम्ही आणले. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही संपूर्ण कुटुंब या कामाला लागलो आहोत. आधी साच्याद्वारे बैलाची मूर्ती तयार केली जाते. ती वाळल्यानंतर त्यावर कलर गनने रंग दिला जातो. ही अनेक दिवसांची प्रक्रिया आहे. त्यानंतरच एवढी सुबक बैलजोडी बाजारात दिसू लागते. दीड लाखांची गुंतवणूक केल्यावर तीस-चाळीस हजार रुपयांचा नफा होतो.

घरी नेताना यंदा शिंग तुटणार नाहीत…

मातीची अथवा पीओपीची एखादी मूर्ती बाजारात खरेदी केल्यानंतर घरी नेईपर्यंत ती तुटण्याचा अनुभव अनेकांचा असतो. बैलजोडी बाबतीत तर अनेकदा घरी जातानाच बैलाची शिंग तुटतात. गेल्या वर्षीही असे अनेक प्रकार घडले होते. त्यामुळे यंदा बैलजोड्या तयार करणाऱ्यांनी ग्राहकांची ही काळजीही दूर केली आहे. बैलाची शिंग माती किंवा पीओपीची न करता थेट प्लास्टिकचीच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे फक्त शिंगांना धरून आपण बैलजोडी उचलली तरीही शिंग निखळण्याची भीती नाही.

शेतकरी वर्गाला पोळ्याची उत्सुकता

बैलपोळा सणाची उत्सुकता शेतकऱ्यांना जास्त असते. आपला बैल गावातील इतर बैलांमध्ये उठून दिसावा म्हणून प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, गावातील पोळ्यात भाग घेतात. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात, गावाच्या सीमेजवळ एक मोठे आंब्याच्या डहाळ्यांचे तोरण बांधतात. त्याच्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या एकत्रित केल्या जातात. त्यासोबतच वाजंत्री, सनई, ढोल-ताशे लावले जातात. यावेळी पोळ्याची गीतेही म्हटली जातात. तसेच बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला अजिबात कामाला जुंपले जात नाही.

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: लग्नाच्या ६ व्या दिवशीच नववधू पळाली, पावणे दोन लाख रुपये आणि दागिने घेऊन मध्यस्थीही पसार

Aurangabad Gold Rate: लक्ष असू द्या, सोन्याचे दर वाढीच्या दिशेने, पहा औरंगाबाद शहरातले सोन्याचे भाव