बीड : बीडमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे या भावंडांत पुन्हा श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न धनंजय मुंडे यांनी सोडवल्याचे राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहेत. तर केंद्रात सत्ता भाजपाची आहे. निधी कोणी आणला हे जनतेला माहीत आहे, असे पंकजा मुंडे (Pankaja Munde) समर्थकांचे म्हणणे आहे. या श्रेयवादाच्या लढाईत सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी माणसे चालू शकणार नाहीत, एवढी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. इतर सुविधांच्या नावानेही बोंब आहे. अशावेळी कामांचे श्रेय घेणे आणि एकूणच अशाप्रकारचे राजकारण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, केंद्रात (BJP) भाजपाचे सरकार आहे. या सरकारकडून धनंजय मुंडे असो किंवा पंकजा मुंडे. यांच्यामार्फत निधी आणला जात जातो. मात्र धनंजय मुंडेंचे याबाबत कौतुक करावेच लागेल, असे विश्लेषकांचे मत आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाजीराव धर्माधिकारी यांच्या मते, भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील अनेक प्रश्नांची खऱ्या अर्थाने सोडवणूक केली. पंकजा मुंडे पालकमंत्री तर खासदार प्रीतम मुंडे होत्या. मात्र विकासकामात काहीही केले नाही. केंद्रीय मंत्री गडकरी हे पक्ष पाहत नाहीत, परळीच्या उड्डाणपुलासाठी त्यांनी 100 कोटी रुपये दिले आहेत. जे आमच्या नगरपरिषदमधील हा अजेंडा होता. चांगले केले तर आम्ही आणि वाईट केले तर तुम्ही असे सध्या पंकजा मुंडे यांच्याकडून सुरू आहे. धनंजय मुंडे यांनीच विकासकामांचा दिव्य हाती घेतला आहे आणि तो कोणी रोखणार नाही, असे ते म्हणाले.
केंद्रात सत्ता भाजपाची आहे. नितीन गडकरी हे केंद्रीय नेते आहे. खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे या वेळोवेळी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध असतात. मात्र माजी पालकमंत्री धनंजय मुंडे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. फंड कोणी आणला हे सर्व जनतेला माहीत आहे. लोकांना कळावे यासाठीच पंकजा मुंडे यांना ट्विट करावे लागले. ताईच्या श्रेयामुळेच परळीला 100 कोटींचा निधी मिळाला आहे, असे भाजपा कार्यकर्ते मुन्ना हजारी म्हणाले.
राजकीय विश्लेषक भागवत तावरे म्हणाले, की भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधून निधी आणणे हे धनंजय मुंडे यांच्यासाठी काही नवीन नाही. फडणवीस यांच्या काळातदेखील परळी नगरपरिषदसाठी 100 कोटींचा निधी त्यांनी आणला होता. विकासाच्या राजकारणामध्ये पाठपुराव्याला अनन्य महत्त्व आहे. परळीच्या उड्डाणपुलासाठी धनंजय मुंडे यांनी दोन वेळा दिल्लीला जाऊन गडकरी यांची भेट घेतलेली आहे. दोन्ही भावंडांची श्रेय वादावरून लढाई सुरू असली तरी गडकरी मात्र यावर काहीही बोलत नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे याचे श्रेय घेऊ शकतात. मात्र धनंजय मुंडेंच्या पाठवपुराव्याचे देखील कौतुक केले पाहिजे, असे ते म्हणाले.