Ashish Shelar: नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमा, आशिष शेलार यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

| Updated on: Apr 13, 2022 | 7:10 PM

Ashish Shelar: दरवर्षी नालेसफाई केल्यानंतरही मुंबईत पाणी तुंबले जाते. त्यामुळे मुंबईची तुंबई होते. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होऊ नये म्हणून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी केली आहे.

Ashish Shelar: नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमा, आशिष शेलार यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमा, आशिष शेलार यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: दरवर्षी नालेसफाई केल्यानंतरही मुंबईत पाणी तुंबले जाते. त्यामुळे मुंबईची तुंबई होते. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होऊ नये म्हणून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांना नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी केली आहे. शेलार यांनी चहल यांच्याकडे तसे निवेदनच दिलं आहे. नालेसफाईची कामे दरवर्षी पेक्षा 15 दिवस उशिराने सुरु होत असून भाजपने (bjp) दौरा केला त्यावेळी अत्यंत भयावह चित्र समोर आले आहे. आजपर्यंत 10 % पेक्षा जास्त काम झालेले नाही. गतवर्षी 17 मे लाच वादळी वाऱ्यासह तौक्ते वादळ आले होते व मुंबई ची तुंबई झाली होती. यावर्षीही लवकर पावसाळा येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खूप कमी वेळ हाती शिल्लक आहेत. अशावेळी पारदर्शी पद्धतीने नालेसफाईची कामे पूर्ण होण्याची गरज आहे, असंही शेलार यांनी सांगितलं.

आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त चहल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नालेसफाईवर आयुक्तांशी चर्चा केली. मुंबईची पाहणी केल्यानंतर मुंबई धोक्याच्या वळणावर असून सत्ताधारी फरार व प्रशासन हाताची घडी घालून बसले आहे. “पूर्व उपनगराचे” तर “पूर उपनगर” होईल कि काय अशी भीती वाटते. भांडूप येथील एपीआय नाल्यामध्ये कल्वर्टचे काम अर्धवट असून ते पूर्ण झाले नाही तर रेल्वे ट्रॅकवर मध्ये पाणी घुसेलच शिवाय भांडूप परिसर जलमय होऊन जाईल. बॉम्बे ऑक्सिजन नाल्यामध्ये उभारलेल्या तटरक्षक भिंतीमुळे प्रवाह अडला आहे असे अजब प्रकार संपूर्ण शहरात पहायला मिळत आहेत, असं शेलार यांनी आयुक्तांना सांगितलं.

अधिकाऱ्यांच्या गाड्यांना सुद्धा जी.पी.एस. बसवा

बहुतांश ठिकाणी कामांना सुरुवात झालेली नाही. गाळ कुठे टाकणार त्यावर लक्ष कोण ठेवणार ? त्याचे वजन कसे करणार ? असे प्रश्न प्रशासनाला विचारले असता अतिरिक्त आयुक्तांनी गाळ घेऊन जाणाऱ्या गाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. ही सिस्टीम तर दरवर्षीच असते तरीही भ्रष्टाचार होतो. त्यामुळे आता आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात मैदानात उतरावे, मुंबईकरांची सेवा करावी, कामांवर लक्ष ठेवावे आणि गाळाच्या गाड्यांसोबत आय.ए.एस. अधिकाऱ्यांच्या गाड्यांना सुद्धा जी.पी.एस. बसवा, अशी मागणीही त्यांनी केली.

25 ते 30 टक्के तरी गाळ निघेल का?

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नालेसफाईचा परिमाण 50 % ने कमी असून नालेसफाई दीड महिना उशिरा सुरु झाली आहे. पण कंत्राट रक्कमेत 32 कोटींची वाढ हे गौडबंगाल काय आहे? नालेसफाई करताना मुंबईच्या नाल्यातून 2020 साली 3 लाख 56 हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. गतवर्षी 2021 साली 4 लाख 36 हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. यावर्षी मात्र केवळ 2 लाख 52 हजार क्युबिक मीटर म्हणजे 50 टक्के गाळ काढण्याचे कंत्राट दिलेले आहे. याचा अर्थ काय? यावर्षी एवढा कमी गाळ कशासाठी काढला जातोय? यामुळे मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रकार वाढणार नाहीत काय? काही कंत्राटदारांना गतवर्षीच दोन वर्षाची कामे देण्यात आली त्यामुळे तुलनात्मक यावर्षी गाळाची टक्केवारी कमी दिसते असे अतिरिक्त आयुक्तांनी या शिष्टमंडळांना सांगितले.

कलानगरात पाणी तुंबत नाही, मुंबईत का?

मग गाळ कमी आणि पैसे 32 कोटींनी अधिक कसे? ही नालेसफाई आहे कि तिजोरीची सफाई असा सवाल शेलार यांनी यावेळी केला. कट कमिशन ठरवले आणि प्रस्तावाला मंजुरी न देता सत्ताधारी फरार झाले. ज्या पद्धतीने कलानगर जंक्शनला पाणी तुंबत नाही त्या पद्धतीने मुंबईत कुठेही पाणी तुंबू नये, अशी व्यवस्था आणि साफसफाई करा, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

संबंधित बातम्या:

मुंबईकरांना मोठा दिलासा! एक मेपासून आता प्रत्येक घरात पाणी

Raj Thackeray Vs Jitendra Awhad : बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास सांगितला, पान नंबर सांगा ना? राज ठाकरेंना आव्हाडांनी पान नंबर तर सांगितलंच पण उताराही

Chandrakant Patil: राज ठाकरेंच्या आधीपासून आम्ही हिंदुत्वाचे मुद्दे मांडतोय; चंद्रकांत पाटलांच्या टोल्याचा नेमका अर्थ काय?