राज्यभरातील किसानपुत्र आक्रमक; 19 मार्चला आंदोलनाचे रणशिंग, नेमकी मागणी काय?

| Updated on: Mar 16, 2022 | 12:30 PM

शेतकरी नेते अमर हबीब म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून, सरकारने पाडलेले खून आहेत. कारण शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण काही कायदे आहेत. ते मागच्या सरकारांनी आहेर केले व वर्तमान सरकार देखील ते कायदे रद्द करत नाही. कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षी कायदे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहेत. ते तत्काळ रद्द झाले पाहिजेत.

राज्यभरातील किसानपुत्र आक्रमक; 19 मार्चला आंदोलनाचे रणशिंग, नेमकी मागणी काय?
19 मार्च 1984 रोजी साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती.
Follow us on

नाशिकः राज्यभरातील किसानपुत्र (Kisanputra) पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी 19 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलनाची (Agitation) हाक दिलीय. या आंदोलनात जवळपास 20 जिल्ह्यातून आलेले किसानपुत्र सहभागी होणार आहेत. शेतकरी आत्महत्या (Farmer Suicides) या राष्ट्रीय आपत्ती मानून रोखाव्यात. यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केलीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज होत आहेत. आतापर्यंत देशात जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. असे असताना, राज्य असो वा केंद्र सरकार त्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय आपत्ती मानले पाहिजे व एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. शेतकरी आत्महत्या हा पुढे ढकलण्या सारखा विषय नाही. इतर सगळी कामे बाजूला ठेवून ‘शेतकरी आत्महत्या’ हा विषय सरकारने अग्रक्रमाने विचारात घेतला पाहिजे, अशी मागणी किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख आणि शेतकरी नेते अमर हबीब यांनी केली आहे.

कोणते कायदे शेतकरीविरोधी?

अमर हबीब म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून, सरकारने पाडलेले खून आहेत. कारण शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण काही कायदे आहेत. ते मागच्या सरकारांनी आहेर केले व वर्तमान सरकार देखील ते कायदे रद्द करत नाही. कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षी कायदे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहेत. ते तत्काळ रद्द झाले पाहिजेत. हे कायदे पक्षपात करणारे आहेत. मुलभूत अधिकारात हस्तक्षेप करणारे आहेत. घटना विरोधी आहेत.

9 वे परिशिष्ट धोक्याचे का?

अमर हबीब म्हणाले की, शेतकरीविरोधी कायदे टिकून राहावे म्हणून आपल्या मूळ घटनेत नसलेले पण पहिली घटना दुरुस्ती करून टाकलेले 9 वे परिशिष्ट हे होय. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. म्हणून हे कायदे टिकून राहिले आहेत. परिशिष्ट 9 मध्ये आज 284 कायदे आहेत त्यापैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण हे कायदे या परिशिष्टात असल्यामुळे ते टिकून राहिले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे. म्हणून शेतकऱ्यांना या कायद्यातून सोडवणे महत्वाचे आहे, असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे.

19 मार्च रोजी अन्नत्याग का?

अमर हबीब म्हणाले की, 19 मार्च 1984 रोजी साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. वीज बिल भरले नाही म्हणून त्याची वीज कपण्यात आली होती. ते वीज बिल भरू शकले नाहीत. जमीन विकायला काढली तर ग्राहक नाही. अशा परिस्थितीत साहेबराव यांना आत्महत्या करावी लागली. 2017 पासून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 19 मार्च रोजी ‘अन्नत्याग आंदोलन’ केले जाते. या आंदोलनात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व विदेशात गेलेले किसानपुत्र देखील सहभागी होतात. लाखाहून अधिक लोक 19 मार्चला उपवास करतात.

कसे सुरू झाले आंदोलन?

अमर हबीब म्हणाले की, 2017 साली साहेबराव करपे यांचे गाव चील गव्हाणला भेट देऊन महागाव येथे उपोषण केले. 2018 साली साहेबराव कुटुंबीयांनी जेथे आत्महत्या केली, त्या दत्तपूर (जि. वर्धा) जवळ पवनार आश्रम येथे उपोषण केले. पुढच्या वर्षी दिल्लीत महात्मा गांधी समाधी परिसरात देशातील अन्य राज्यातील मित्रांसोबत उपवास केला. 2020 साली पुण्यात म. फुले वाड्याला भेट देऊन बालगंधर्वच्या समोर उपोषण केले. गेल्या वर्षी औंढा नागनाथ येथून चीलगव्हाण पर्यंत किसानपुत्रांनी पदयात्रा काढली. चिल गव्हाण येथे उपवासाची सांगता केली. हे आंदोलन दरवर्षी सुरूच राहील.

कुठून निघेल पदयात्रा?

अमर हबीब म्हणाले की, या वर्षी आम्ही पानगाव येथून पदयात्रा काढीत आहोत. पदयात्रेत महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातून आलेले 50 किसानपुत्र भाग घेणार आहेत. 1980 साली पोलीस गोळीबारात ठार झालेल्या हुतात्मा रमेश मुगे यांच्या स्मारकाला अभिवादन करून ही पदयात्रा निघेल. ती फावडेवाडी, चोपनवाडी मार्गे जाऊन घाटनांदूर येथे मुक्काम करेल. 18 तारखेला ही पदयात्रा दत्तपूर मार्गे पूसला जाईल व गिरवली येथे मुक्काम करेल. गिरवली येथे महिलांचा मेळावा होईल. डॉ शैलजा बरुरे या मेळाव्याला मार्गदर्शन करतील. 19 मार्च रोजी धायगुडा, पिंपळा मार्गे पदयात्री अंबाजोगाईला जातील. दुपारी अडीच वाजता अंबाजोगाईच्या आंबेडकर चौकात या पदयात्रेचे स्वागत होईल. 3 वाजता श्री मुकुंदराज साभागृहात किसानपुत्रांचा मेळावा होईल. या मेळाव्याला अमर हबीब, डॉ राजीव बसरगेकर, सुभाष कच्छवे व महाराष्ट्रातील भिन्न जिल्ह्यातून आलेले किसानपुत्र मार्गदर्शन करतील.

आंदोलन कधीपर्यंत?

अमर हबीब म्हणाले की, जो पर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहतील तोपर्यंत दर वर्षी 19 मार्च रोजी किसानपुत्र उपवास करीत राहतील. शेतकरी आत्महत्यांचे संकट लवकर दूर व्हावे यासाठी किसानपुत्रांची ही धडपड आहे. 19 मार्च रोजी जास्तीजास्त लोकांनी उपवास करावा, असे आवाहन अमर हबीब, सुभाष काच्छवे, दत्ता वालेकर, डोणे गुरुजी व शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केले आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत