मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच कारणामुळे सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आल्याचे सांगण्यात येतेय. मात्र, असे असले तरी लवकरच राज्यातील या निर्बंधांची मुदत संपणार आहे. त्यामुळे लॉकाडाऊन, कोरोना नियम यावर बोलताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका शब्दात उत्तर दिले आहे. त्यांनी ”जगाल तर जेवाल” असे म्हणत राज्यात लॉकडाऊन (Lockdown) वाढवावा अशी थेट भूमिका मांडली आहे. आज (28 एप्रिल) कोरोना संसर्ग आणि लसीकरणावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. याच बैठकीविषयी बोलताना आव्हाड यांनी वरील भाष्य केले. ते मुंबईत बोलत होते. (Jitendra Awhad comment on Corona virus and Lockdown says Lockdown must extend)
सध्या राज्यात सर्व ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरापासून ते गावापर्यंत सर्वच ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. त्यानंतर राज्याने लागू केलेल्या ब्रेक द चेनमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. तसेच पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. यावर बोलताना “राज्यात लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. महाराष्ट्र आणि मुंबईची काही दिवसांपूर्वीची रुग्ण संख्या पाहा आणि आताची पहा ती नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय. पहिला विषाणू हा आताच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. माणसाच्या शरीरातला खूप ऑक्सिजन तो खात आहे. त्यामुळे आपल्याला खूप ऑक्सिजनची गरज भासणार आहे. यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात आता प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे असाच कोरोना वाढला तर तिथल्या यंत्रणेवर ताण पडून ती कोलमडू शकते. प्रत्येक कुटुंबातील किंवा ओळखीतल एक जण तरी गेलं आहे,” असे आव्हाड म्हणाले.
राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच कारणामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच अनेकांनी स्थलांतरसुद्धा केलं आहे. त्यामुळे राज्यात एक गट लॉकडाऊनला विरोध करतो आहे. यावर बोलताना आव्हाड यांनी कडक शब्दात उत्तर दिले आहे. “यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात आता प्रादुर्भाव वाढतोय. तिथल्या यंत्रणेवर ताण पडून ती कोलमडू शकते. प्रत्येक कुटुंबातील किंवा ओळखीतलं एक जण तरी गेलं आहे. माझे एका शब्दात उत्तर आहे, जगाल तर जेवाल. जगला नाहीत तर जेवणार कुठून ? सर सलामत तो पगडी पचास,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सध्या राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध येत्या 1 मे रोजी संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे सध्याचे लॉकडाऊनचे नियम संपुष्टात येणार का याबाबत अनेक तर्गवितर्क लावण्यात येत आहेत. यावर बोलताना आव्हाड यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. “महाविकास आघाडी सरकारची कोअर कमिटी ही लॉकडाऊनबाबत निर्णय घेते. मात्र, सध्या लॉकडाऊन वाढवला पाहिजे असे माझे मत आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. साधारण 15 मे पर्यंत लॉकडाऊन करावा असे सर्व मंत्र्यांचे मत आहे. शेवटी मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
इतर बातम्या :
राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांचं मोठं विधान
(Jitendra Awhad comment on Corona virus and Lockdown says Lockdown must extend)