पवार साहेब तुमचं आडनाव फडणवीस असतं तर कुणी हुंगलं नसतं… सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

| Updated on: Apr 24, 2024 | 12:31 PM

माजी मंत्री सदाभाऊ खोत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यासाठी ते गावोगावी जात आहे. अस्सल रांगडी भाषेत भाषण करणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. पवारांना खोटं बोलून रेटून चालावं लागत आहे असा निशाणा त्यांनी साधला.

पवार साहेब तुमचं आडनाव फडणवीस असतं तर कुणी हुंगलं नसतं... सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
Follow us on

आपल्या रांगडी भाषेसाठी प्रसिद्ध असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांना माहीत आहे. आपल्या खास शैलीत सदाभाऊ विरोधकांचा समाचार घेतात. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. ‘ पवार साहेब जर तुमची जात वेगळी असती ! तुमचेही आडनाव फडणवीस असते तर तुम्हालाही कोणी हुंगले नसते’ अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. यापूर्वीही सदाभाऊ खोत यांनी अनेक वेळेस शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.

लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरूवात झाली असून प्रचारसभांनाही वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांचेही राजकारण या काळात सुरूच आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ‘ गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्रात मूठभर सरदारांचे राजे होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवणारे देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील आघाडी सरकारची सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता उलथवून टाकली. त्यामुळेच शरद पवार यांना फडणवीस यांची जात काढावी लागली असा आरोप त्यांनी केला’.

काय म्हणाले सदाभाऊ खोत ?

आम्ही सर्व घटकपक्ष भारतीय जनता पक्षासोबत आहोत. आमचा लढा होता तो सर्व सामान्य माणसाला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा होता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुख संपन्नता आणि आनंद असला पाहिजे. आम्हाला काय मिळण्यापेक्षा शेतकऱ्यांना काय देणार ही भूमिका होती.

गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्रात मूठभर सरदारांचे राजे होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवणारे देवेंद्र फडणवीस होते. म्हणून शरद पवारांनाही फडणवीस यांची जात काढावी लागली. पवार साहेब जर तुमची जात वेगळी असती ! तुमचेही आडनाव फडणवीस असते तर तुम्हालाही कोणी हुंगले नसते, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागले. एकच बाप असा भेटला तो शरद पवारांना पुरून उरला, म्हणून पवारांना खोटे बोलून रेटून चालावं लागत आहे अशी टीकाही त्यांनी केली.

वाडा विरुद्ध गाव वाडा अशी लढाई

पश्चिम महाराष्ट्र हा शिव,शाहू आणि फुले यांच्या विचाराने मंतरलेला जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राजू उभा केलं, महात्मा फुले आणि शाहू महाराजांनी वंचितांच्या बाजूने लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा समतेचा मार्ग स्वीकारून तळागाळातील माणसासाठी लढत राहिले. पण आता महान व्यक्तींचं नाव घेणारी माणसं आता कुठे आहेत ? त्यामुळे आत्ताची लढाई आहे ती वाडा विरुद्ध गाव वाडा अशी आहे. छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर देखील वाड्यांच्या विरोधात लढले होते. महायुतीच्या माध्यमातून हे वाडे उध्वस्त होतील, महायुतीचा विजय या ठिकाणी नक्की होणार असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

इंडिया मध्ये असणारे नेते हे सर्व लुटारू

27 एप्रिल ला कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. पुन्हा एकदा ही जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीमागे उभी राहील. ही लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया मध्ये असणारे नेते हे सर्व लुटारू आणि अलीबाबाचे साथीदार आहेत, असे टीकास्त्र खोत यांनी चढवले. पंतप्रधान मोदी हे भारतातील अठरापगड जातीला सोबत घेऊन जातात , त्यामुळे इंडिया आघाडीच्या लुटारूंना महायुती मूठ माती देईल असेही ते म्हणाले.