महाराष्ट्रातील अतिदुर्गम गाव, स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर ना आरोग्य सुविधा, ना वीज, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचीही फरफट

| Updated on: Jul 28, 2021 | 10:45 AM

रुई गावात पोहोचायचं असेल तर कोणत्या ही मार्गाने जा, तिथून पुढे किमान दहा किमी जंगलातून पायी चालत जावं लागतं. त्यातही दोन फॉरेस्ट ऑफिसमध्ये नोंद करावी लागते.

महाराष्ट्रातील अतिदुर्गम गाव, स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर ना आरोग्य सुविधा, ना वीज, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचीही फरफट
रुई गाव, महाराष्ट्र
Follow us on

वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या टोकावर असलेलं अतिदुर्गम भागातील रुई गाव… या गावात स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर अजूनही कोणतीच सुविधा पोहोचलेली नाही. कारण त्या गावाची लोकसंख्या फक्त 28 आहे. तर तेथे फक्त 16 मतदार आहेत, त्यामुळे याकडे ना राजकारणी लक्ष देत, ना प्रशासन. त्यामुळे या गावातील नागरिकांना आजही मरण यातना भोगाव्या लागत आहेत.

मंगरुळपीर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेलं आठ घराच्या वस्तीच रुई गावं आहे. या गावातील लोकसंख्या 28 आहे. तर येथील मतदार फक्त 16. यात तांदळी, भुर, रुई अशी गटग्रामपंचायत आहे. त्यामुळं गावाकडे सरपंच किंवा कोणताच राजकीय पक्ष लक्ष देत नाही. तर जिल्हा प्रशासनाला हे गावचं माहीत आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दहा किमी जंगलातून पायी फरपट

रुई गावात पोहोचायचं असेल तर कोणत्या ही मार्गाने जा, तिथून पुढे किमान दहा किमी जंगलातून पायी चालत जावं लागतं. त्यातही दोन फॉरेस्ट ऑफिसमध्ये नोंद करावी लागते. त्यामुळे येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने रुई गावातील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत.

जीव मुठीत धरुन शाळेत 

सरकार सर्व शिक्षा अभियान राबवून कोट्यवधी रुपये खर्च करीत असून बेटी बचाव बेटी पढाव सारखे नारे देत आहे. मात्र रुई गावात शाळा नसल्याने येथील मुलींना दप्तर पाठीवर घेवून या जंगलातून किमान 10 किमी पायी चालत शाळेत जावं लागतं. जंगलात हिंसक वन्यप्राणी असल्याने जीव मुठीत धरुन शाळा गाठावी लागत असल्याने शासनाने मानव विकास मिशनची गाडी मुलीकरिता सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ना आरोग्य सुविधा, ना वीज 

तसेच गावात कोणतीच आरोग्य सुविधा नाही. या गावात आठवड्यातून तीन दिवस कृषी पंपाची वीज असते. तर चार दिवस गाव अंधारात असते. तर दुसरीकडे गावकऱ्यांना रेशन मिळते, मात्र 20 किमी अंतरावरुन डोक्यावर घेवून यावं लागतं. त्यामुळं तीन तीन महिने घेऊन येता येत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

रुई गावाच्या चारही बाजूनी जंगल असून गावालगत रस्त्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यात गावातून बाहेर पडण्यासाठी मार्गच उरत नाही. दोन ते तीन महिने बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटतो. अशावेळी एखाद्या व्यक्तीची तब्ब्येत बिघडल्याने औषधोपचारासाठी आणि गर्भवती महिलांना दवाखान्यात प्रसुतीसाठी जाण्यास अनेक अडचणींना समोरे जावे लागते. कधीकधी वेळप्रसंगी जीवही गमवावा लागत आहे.

“जिल्हा प्रशासनाने नागरिकांना न्याय द्यावा”

कोरोना काळात रुई गावात कोणतीच सुविधा नसल्याने शेलुबाजार येथील बडोले डॉ दांपत्याने हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे आता या गावातील आरोग्य समस्या आजीवन मोफत उपचार करणार आहेत. त्यामुळं गावातील नागरिकांना तेवढा तरी आधार झाला आहे.

ग्रामीण भागात विकासासाठी राज्य सरकार अनेक योजना राबवित असून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र रुई गावात अजून कोणतीच योजना पोहोचली नाही. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या गावच्या समस्या सोडवाव्यात आणि येथील नागरिकांना न्याय द्यावा हीच अपेक्षा केली जात आहे.

(Maharashtra Rui Extremely remote village no health facilities electricity and education for children after 74 years of independence)

संबंधित बातम्या : 

राज्यात ओढवलेल्या पूरपरिस्थितीग्रस्तांना नवी मुंबई महापालिकेमार्फत 1 कोटी रुपये द्या, मंदा म्हात्रेंची मागणी

चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिका धावली, 43 जणांचे वैद्यकीय पथक रवाना

महाडमधील पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात, घनकरचा व्यवस्थापनासह ‘या’ विभागांकडून तातडीची मदत