मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत मोठ्या प्रयत्नाने निवड होऊनही अद्याप नियुक्ती न झालेल्या विद्यार्थ्यांनी कोरोना आला त्यात आमचा काय दोष? असा सवाल केलाय. “सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी साधारण 4 ते 5 वर्षांनी या पदासाठी जाहिरात येते. त्याप्रमाणे 2017 ला 833 जागांसाठी या पदाची परीक्षा घेण्यात आली. त्याचा सुधारित निकाल सप्टेंबर 2019 ला लागला. यामध्ये कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नियुक्तीसाठी 832 जागांची शिफारस करण्यात आली. मात्र, अद्यापही नियुक्ती झाल्या नाहीत,” अशी तक्रार पीडित एमपीएससी विद्यार्थ्यांनी केलीय.
निकालानंतरच एमपीएससी कागदपत्रांची पडताळणी करते. विशेषतः या परीक्षेसाठी चार चाकी वाहनं चालवण्याचं लायसन्स आवश्यक असतं. त्यामुळे कागदपत्र पडताळणीतून बाहेर पडणाऱ्या उमेदवारांची संख्याही जास्त असते. 832 जागांच्या कागदपत्र पडताळणीमधून एकूण 151 उमेदवार अपात्र ठरले. या 151 अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जागी 151 उमेदवारांची गुणवत्तेनुसार पहिली प्रतीक्षा यादी लावणे अपेक्षित होते; परंतु आयोगाने एकूण 135 उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली.
उर्वरित 16 उमेदवार हे प्रतिक्षेतच राहिले. ज्या 135 उमेदवारांची पहिली प्रतीक्षा यादी लावली होती. त्यामधूनही एकूण 31 उमेदवार हे कागदपत्र पडताळणीतून बाहेर पडले. म्हणजे प्रतीक्षा यादीतून शिफारस न झालेले 16 आणि पहिल्या प्रतीक्षा यादीतून कागदपत्र पडताळणीनंतर रिक्त राहिलेल्या 31 जागा अशा 47 जणांची दुसरी प्रतिक्षा यादी लावणे अपेक्षित होते.
मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालयाच्या उपस्थिती नियंत्रित करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2016 च्या आदेशानुसार निकालानंतर एक वर्षाच्या आत किंवा पुढील जाहिरात यापैकी अगोदर जो दिनांक असेल तोपर्यंत प्रतिक्षा यादीतून रिक्त जागांवर उमेदवारांची निवड करणे आवश्यक आहे. या पदासाठी रिक्त जागांवर प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याची शेवटची दिनांक ही 8 सप्टेंबर 2020 होती.
कोरोना टाळेबंदीमुळे मोटार वाहन विभागाला उर्वरित 47 उमेदवारांचे मागणीपत्र आयोगाकडे देणे अंतिम दिनांकापर्यंत शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी शासनातर्फे आयोगाला उर्वरित नियुक्त्यांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली. ती आयोगाकडून फेटाळण्यात आली. त्यामुळे उर्वरित 47 उमेदवार हे नियुक्तीच्या प्रतिक्षेतच आहेत. म्हणूनच संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाला 833 पदांसाठी जाहिरात असताना पूर्ण 833 पदे अजूनही का भरली जात नाहीत? असा सवाल विचारलाय.
“नुकतेच 12 जुलै रोजी आयोगाचे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर झाले. त्यामध्ये आयोगाने स्पष्ट केले की कोरोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमूळे निकाल लावण्यास, परीक्षा घेण्यास विलंब झाला. मग हाच न्याय या 47 नियुक्त्यांसाठी का नाही? त्यांच्याही नियुक्त्या टाळेबंदीमुळे झालेल्या दिरंगाईमुळे लटकल्या आहेत. एकीकडे आयोग स्वतःच्या सोयीनुसार कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर टाकत आहे आणि दुसरीकडे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या बाबतीतही मात्र नियमाचा बडगा दाखवून प्रतीक्षा यादीसाठी टाळाटाळ करीत आहे,” असा आरोप नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी केलाय.
नियुक्तीच्या प्रतिक्षेतील उमेदवार राजकुमार देशमुख म्हणाले, “कोरोना आला त्यात आमची चूक काय, संपुर्ण देशावर हे संकट असताना आमच्या नियुक्त्या प्रलंबित ठेवल्या गेल्या आहेत.” “शासनाने एमपीएससी बरोबर बैठक घेऊन कोरोनाच्या आपत्तीमुळे रखडलेला AMVI पदाच्या नियुक्त्यांना मंजुरी द्यावी,” अशी मागणी नियुक्तीच्या प्रतिक्षेतील उमेदवार दत्तात्रय दूरगुळे यांनी केली.
संदीप शेलार म्हणाले, “मोटार वाहन विभागाला आयोगाने विहित केलेल्या वेळात कोरोना टाळेबंदीमूळे नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. एमपीएससी आणि मोटार वाहन विभाग यांच्यात नसलेल्या ताळमेळाचा फटका आम्हाला का? उमेदवारांची यात चूक काय?” “मंत्रालयाचे अनेकवेळा उंबरठे झिजवले, मात्र प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे मिळत असून नियुक्तीसाठी कोणीही जबादारी स्वीकारायला तयार नाही,” असं मत नियुक्तीची वाट पाहणाऱ्या अमित टाके यांनी व्यक्त केलं.
MPSC selected student ask what is our fault in appointment delay