‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे विविध आजारांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर!, मुख्यमंत्र्यांकडून काळजी घेण्याचं आवाहन

| Updated on: Nov 08, 2020 | 3:06 PM

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेद्वारे राज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलं. त्यासाठी राज्यभरात ६० हजार कर्मचारी कार्यरत होते. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात कोरोनासह अन्य आजारांच्या रुग्णांची मोठी आकडेवारी समोर आली आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेद्वारे विविध आजारांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर!, मुख्यमंत्र्यांकडून काळजी घेण्याचं आवाहन
Follow us on

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ ही मोहीम राबवली. या मोहिमेतून विविध आजार आणि रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मोहिमेद्वारे केलेल्या सर्वेक्षणातून राज्यात 51 हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग आणि अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची मोठी आकडेवारी समोर आली आहे. (CM Uddhav Thackeray on Maze Kutumb Mazi Jababdari campaign shocking statistics)

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारे राज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलं. त्यासाठी राज्यभरात ६० हजार कर्मचारी कार्यरत होते. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात राज्यात मधुमेहाचे 8 लाख 69 हजार 370 रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ लाख जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्याचबरोबर हृदयविकाराचे ७३ हजार आणि कर्करोगाचे 17 हजार 843 रुग्ण आहेत. तर 1 लाख 6 हजार 877 रुग्णांना अन्य आजार असल्याची धक्कादायक माहिती ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून समोर आली आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून समोर आलेली आकडेवारी म्हणजे राज्याचा आरोग्य नकाशा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. या सर्व रुग्णांना संपर्कात ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढे चालून राज्य सरकारने राबवलेल्या मोहिमेचा किती उपयोग झाला? हे लक्षात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा- मुख्यमंत्री

राज्यात कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे. प्रदुषणामुळे हा विषाणू अधिक धोकादायक आहे. अशावेळी दिवाळी साजरी करताना प्रदुषण करणारे फटाके फोडू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. दिवाळीत फटाकेबंदी करणार नाही, पण जनतेनं स्वत:हून फटाके फोडणं टाळावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मंदिरांबाबत दिवाळीनंतर नियमावली

राज्यातील मंदिरं सुरु करण्याची मागणी विरोधक आणि मंदिर संस्थांकडून होत आहे. पण कोरोनाचं संकट अजून कायम आहे. मात्र दिवाळीनंतर मंदिरं सुरु करण्याबाबद नियमावली तयार करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. अशावेळी नियमावली आखणं गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारच्या मोहिमेनंतर मुंबईतील परिणाम

1. मुंबईतील सक्रिय रुग्णात 29 टक्क्याने घट झाली.
2. सीलबंद इमारतीची संख्या 30 टक्के तर कंटेन्मेंट झोन 13 टक्के घट झाली आहे.
3. कोरोना संसर्गाचे प्रमाण 1.06 टक्क्यांवरुन 0.41 टकक्यांपर्यंत खाली आले आहे.
4. कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर हा 66 दिवसांवरून 171 दिवसांवर गेला आहे.
5. ऑक्टोबर महिन्याचा मृत्यू दर 2 टक्के इतका आहे. तर एकत्र मृत्यूचा दर 4.4 टक्क्यावरून 9.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
6. रिक्त कोविड बेडची उपलब्धता 4 हजार 986 बेडवरुन 7 हजार 817 बेडवर गेली आहे.
7. रिक्त आयसीयू बेडची उपलब्धता आता 225 बेडवरून 561 बेडवर गेली आहे.
8. ऑगस्टमध्ये सुमारे 6500 सरासरी दैनंदिन चाचणी, सरासरी दैनंदिन चाचणी सुमारे 14000-16000 (बहुधा केवळ आरटी-पीसीआर) झाली आहे.
9. तर एकूण रुग्ण डिस्चार्ज रेट 82 वरून 89 वर गेली आहे.
10. रुग्णालयांमधील गंभीर रूग्णांची संख्या 2 टक्क्यांनी घटली आहे.
11. मुंबईत रविवारी 897 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. मात्र सोमवारी फक्त 693 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या:

धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल: मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray on Maze Kutumb Mazi Jababdari campaign shocking statistics