रेल्वेची अजब तऱ्हा, AC लोकल नावालाच, वारंवार यंत्रणा बंद, जाब विचारणाऱ्या प्रवाशांवरच कारवाई

Mumbai ac Local: वारंवार रेल्वे प्रशासनाला एसी ट्रेनमध्ये एसी बंद पडत आहे. यासंदर्भात तक्रार करून प्रशासन लक्ष देत नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. रेल्वेकडून आपली चूक मान्य करण्याऐवजी प्रवाशांवर कारवाई होत आहे.

रेल्वेची अजब तऱ्हा, AC लोकल नावालाच, वारंवार यंत्रणा बंद, जाब विचारणाऱ्या प्रवाशांवरच कारवाई
mumbai ac local (file Photo)
| Updated on: Apr 23, 2024 | 11:53 AM

मुंबईत लोकलमध्ये प्रवाशी घामाघूम होऊ लागले आहे. यामुळे अनेक मुंबईकर आता एससी लोकलच्या प्रवासाला प्राधान्य देत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने या एसी लोकल सुरु केल्या आहेत. त्याचे तिकीट दर भरमसाठ आहेत. परंतु त्यानंतर सुखमय प्रवास होईल, यामुळे हजारो मुंबईकर एसी लोकलमधून प्रवास करत असतात. या एसी लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा वारंवार बंद पडत आहे. यापूर्वी अनेक वेळा हा प्रकार घडला आहे. आता एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके बसत असताना मंगळवारी एसी लोकलमधील यंत्रणा कल्याणमध्ये बंद पडली. एसी बंद झाल्याने लोकल ट्रेनमध्ये श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे कल्याण स्टेशनवर प्रवाशांनी गोंधळ घातला. त्याचा जाब विचारला. त्यावेळी रेल्वेने आपल्या चूक मान्य करण्याऐवजी प्रवाशांवर कारवाई केली.

एसी बंद, श्वास घेणेही अवघड

कल्याणवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला सकाळी 8:45 वाजता जाणाऱ्या एसी लोकलमध्ये हा प्रकार घडला. एसी बंद झाल्यामुळे रेल्वेच्या डब्यात प्रवाशी हवालदील झाले. त्यांना श्वास घेणेही अवघड होऊ लागला. यामुळे प्रवाशांनी गोंधळ सुरु केला. या गोंधळानंतर कल्याण आरपीएफ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन प्रवाशांना ताब्यात घेतले. त्यावेळी ट्रेनमध्ये एसी सुरू न करता ट्रेन रवाना झाली.

प्रवाशांवरच कारवाई

वारंवार रेल्वे प्रशासनाला एसी ट्रेनमध्ये एसी बंद पडत आहे. यासंदर्भात तक्रार करून प्रशासन लक्ष देत नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. रेल्वेकडून आपली चूक मान्य करण्याऐवजी प्रवाशांवर कारवाई होत आहे. या प्रवाशांना लवकर सोडण्यात यावे, अन्यथा रेल्वे संघटनेकडून आंदोलन उभारण्यात येईल. दरम्यान, पोलिसांनी याबाबत दोन्ही प्रवाशांना नोटीस देऊन सोडले आहे.

लाखो मुंबईकर चाकरमाने, व्यापारी यांच्या प्रवास लोकलने होत असतो. एकीकडे रेल्वे चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु दुसरीकडे यंत्रणा विस्कळीत होत असताना त्यात दुरुस्तीऐवजी प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. यामुळे प्रवाशी नाराज होत आहे.