भीषण आगीतून मुंबईकरांना वाचवणारे पाण्याचे नळखांब गायब, काही भूमिगत, तर काहींची दयनीय अवस्था

| Updated on: Jan 10, 2021 | 5:21 PM

याबाबत सर्व राजकीय नेते व त्यांचे कार्यसम्राट नगरसेवक मुग गिळून गप्प आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (Mumbai Fire Water Hydrant Are Not Working) 

भीषण आगीतून मुंबईकरांना वाचवणारे पाण्याचे नळखांब गायब, काही भूमिगत, तर काहींची दयनीय अवस्था
Follow us on

मुंबई : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डला शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत 17 नवजात बाळांपैकी 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीनंतर राज्यातील अग्निसुरक्षा यंत्रणेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भीषण आगीतून मुंबईकरांना वाचवणारे पाण्याचे नळखांब (Fire Hydrant) गायब झाले आहे, असा प्रश्न माहिती अधिकारी कार्यकर्ते आणि प्रशासकीय कामकाज सल्लागार शरद यादव यांनी उपस्थित केला आहे. (Mumbai Fire Water Hydrant Are Not Working)

भीषण आग विझविण्यासाठी पाण्याची तात्काळ आवश्यकता भासते. मुंबईकरांच्या जीविताची आणि त्यांच्या मालमत्तेची काळजी घेऊन ब्रिटीशांनी अग्निशामक नळखांबांची (FIRE HYDRANT ) व्यवस्था शहरात जागोजागी केली होती. जेणेकरुन शहरात कुठेही भीषण आग लागल्यास अग्निशामक नळखांबांद्वारे पाण्याचा पुरवठा तात्काळ होईल. यामुळे ही भीषण आग तात्काळ विझवता येणे शक्य होईल.

मात्र, आज अशा अत्यावश्यक सेवेसाठी असणार्‍या अग्निशामक नळखांबांची अवस्था दयनीय झाली आहे. मुंबईतील अनेक अग्निशामक नळखांब अकार्यक्षम झालेले आहेत. तर काही नळखांब हे भूमीगत झाल्याचे समजते, असेही शरद यादव यांनी म्हटले.

ब्रिटीशांनी उभारलेल्या अग्निशामक नळखांबांचे नियोजन आणि परिरक्षण मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता यांच्या अखत्यारीतील बांधकाम खाते का करीत नाही? असा सवाल शरद यादव यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सर्व राजकीय नेते व त्यांचे कार्यसम्राट नगरसेवक मुग गिळून गप्प आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबई शहर तसेच पूर्व-पश्चिम उपनगरातील अस्तव्यस्त तसेच कोलमडलेली वाहतूक व्यवस्था पाहता भीषण आग लागलेल्या ठिकाणी अग्निशामक दलाचे पाण्याचे टँकर आणि बंब वेळेवर पोहोचणे अशक्य आहे. यासाठी तात्काळ पर्याय म्हणून या अग्निशामक नळखांबांचा उपयोग होतो.

मुंबई महापालिकेचा 37,000 कोटींचा सर्वाधिक अर्थसंकल्प असलेल्या पालिकेतील सत्ताधारी आणि पहारेकरी मात्र, नागरिकांच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आवश्यक उपाययोजनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम-266 अन्वये जागोजागी अग्निशामक नळखांबांची उभारणी करण्याची तरतूद आहे. मात्र सत्ताधारी आणि पहारेकरी अर्थ-कारणातच मग्न आहेत. हे सर्वजण सर्वसामान्य मुंबईकरांचा आगीत होरपळून कोळसा होण्याची वाट पाहत आहेत, असेही ते म्हणाले.

माहितीचा अधिकारात आम्ही याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. मात्र असे असूनही टक्केवारीत गर्क असलेले मुंबई महानगरपालिकेत वर्षोनुवर्षे ठाण मांडून बसलेले सत्ताधारी आणि तथाकथित पहारेकरी झोपेचे सोंग घेतलेल्या अवस्थेत आहेत.

या गंभीर प्रकरणाबाबत मा.उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्वरीत हस्तक्षेप करावा. तसेच मुंबई महानगरपालिकेस तात्काळ आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना पुनर्स्थापित करणेबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी शरद यादव यांनी केली आहे.  (Mumbai Fire Water Hydrant Are Not Working)

संबंधित बातम्या : 

Bhandara Hospital Fire | मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा, दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाच्या पाहणीसह पालकांचेही सांत्वन

भंडारा दुर्घटनेत भाजपची मागणी भाई जगताप यांनाही मान्य, म्हणाले…