राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चे 1 हजार 500 च्या आसपास रुग्ण, राजेश टोपेंची केंद्राकडे 3 महत्वाच्या मागण्या

| Updated on: May 13, 2021 | 5:25 PM

राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1 हजार 500 पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

राज्यात म्युकरमायकोसिसचे 1 हजार 500 च्या आसपास रुग्ण, राजेश टोपेंची केंद्राकडे 3 महत्वाच्या मागण्या
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने महाराष्ट्रात शिरकाव केलाय. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1 हजार 500 पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. इतकच नाही तर या आजाराबाबत केंद्र सरकारकडे महत्वाच्या तीन मागण्या केल्याचंही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत ६ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. त्यानंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Important demands of Rajesh Tope to the Central Government regarding Mucormycosis)

राज्यात सध्या 1 हजार 500 च्या आसपास म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती विविध कारणांमुळे कमी झाली आहे. तसंच ज्या रुग्णांच्या रक्तात आयर्न म्हणजेच फेरेटिनचं प्रमाण जास्त आहे, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका असल्याचं टोपे म्हणाले.

म्युकरमायकोसिसबाबत महत्वाच्या मागण्या

अशावेळी महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसंच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत 6 हजाराच्या आसपास आहे. एका रुग्णाला 20 – 20 इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. अशावेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी अशी आग्रही मागणी टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केलीय. त्याचबरोबर म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराबाबत जनजागृतीची गरज असल्याचं टोपे म्हणाले. काळ्या बुरशीवर प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे, त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याटं टोपे यांनी यावेळी म्हटलंय.

राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात – टोपे

परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सध्या ग्राफ कमी होत आहे. सध्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी होत आहेत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा मराठवाड्यातील बीड येथे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला सातत्याने काळजी घ्यावी लागणार आहे. जागरुक राहावे लागणार आहे.

चाचण्या कमी होत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, आज झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री महाराष्ट्राची परिस्थिती सुधारत आहे, ही चांगली बाब आहे. महाराष्ट्र चाचण्यामंध्ये चांगले काम करत आहे, असे म्हणाले आहेत. बारा कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात आतापर्यंत तीन कोटी चाचण्या झाल्या आहेत.

आजच्या आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मी लसीच्या उपलब्धतेवर जोर दिला. लसीकरणाबाबत योग्य व्यवस्थापन होत नाहीये. कारण आज आम्हाला वीस ते बावीस लाख लोकांना लसीचा दुसरा डोस हवा आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जेवढ्या लसी लागत आहेत, त्या देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. ती आमची अपेक्षा आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना मी सांगितले.

वीस लाख लसी द्याव्या – राजेश टोपे

आम्हाला त्वरीत लसीच्या लसीचे वीस लाख डोस द्यावेत अशी मागणी मी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. केंद्राने सहा लाख लसी पाठवल्या. राज्याने खरेदी केलेले तीन लाख डोस असे एकूण जवळपास नऊ लाख डोस आम्ही 44 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना देत आहोत. त्यामुळे केंद्र सरकारने वीस लाख लसी त्वरीत देणे गरजेचे आहे.

लस आयात करण्यासाटी ग्लोबल पॉलिसी हवी

जवळ-जवळ सगळ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की लसी आयात करण्यासाठी एक ग्लोबल पॉलिसी असावी. यामध्ये मीसुद्धा होतो. असे नसेल तर सगळ्या राज्यांमध्येच स्पर्धा सुरु होईल. त्याचा फायदा देशाबाहेरच्या कंपन्यांना होईल. ही अनहेल्दी पॉलीसी नको, अशी मागणी सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांनी केली.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊन वाढल्यामुळे व्यापारी ठाकरे सरकाविरोधात आक्रमक; तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

कोरोना काळात कार मेंटेनन्सचं टेन्शन विसरा, Mahindra ने गाड्यांची फ्री सर्व्हिसिंग मुदत, वॉरंटी वाढवली

Important demands of Rajesh Tope to the Central Government regarding Mucormycosis