Mumbai Lockdown : ‘मॅनेजमेंट गुरु’ म्हणवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ, 5 हजारापैकी फक्त 200 उरले!

| Updated on: Apr 15, 2021 | 3:17 PM

दोन वेळची भूक भागवण्यासाठी डबेवाल्यांना आपला व्यवसाय सोडून हाती पडेल ते काम करण्याची वेळ आली आहे. तर काही जणांनी हाती काम नसल्यामुळे गाव गाठलंय.

Mumbai Lockdown : मॅनेजमेंट गुरु म्हणवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ, 5 हजारापैकी फक्त 200 उरले!
लॉकडाऊनमुळे मुंबईतील डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ
Follow us on

मुंबई : ‘मॅनेजमेंट गुरु’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईच्या हजारो डबेवाल्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्याला कारण ठरलाय तो कोरोना आणि लॉकडाऊन. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर गदा आलीय. त्यामुळे दोन वेळची भूक भागवण्यासाठी डबेवाल्यांना आपला व्यवसाय सोडून हाती पडेल ते काम करण्याची वेळ आली आहे. तर काही जणांनी हाती काम नसल्यामुळे गाव गाठलंय. (Time of starvation on Mumbai Dabewala due to lockdown)

आर्थिक मदत द्या, डबेवाल्यांची सरकारला साद

मुंबईतील एकूण 5 हजार डबेवाल्यांपैकी फक्त 400 ते 500 डबेवाले काम करत होते. पण आता नव्याने लॉकडाऊन लावल्यामुळे त्यातील 200 ते 250 डबेवाल्यांनी व्यवसाय बंद केलाय. आम्ही सरकारला विनंती करतो की डबेवाल्यांना काही आर्थिक मदत करा, अशी विनंती विष्णू काळडोके यांनी केलीय.

गेल्या वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर गदा आलीय. त्यामुळे अनेकांनी आपलाय व्यवसाय सोडून आता अक्षरश: हमाली आणि सुरक्षा रक्षकाची नोकरी पत्करलीय. मधल्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा डबेवाल्यांना होती. पण पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

हमाली करण्याची वेळ!

नोकरी, व्यवसायासाठी कार्यालयात बसलेल्या आपल्या आप्तांना घरचं ताजं आणि पौष्टिक जेवण मिळावं अशी अपेक्षा घरच्या मंडळींना असते. त्यांची हीच अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मुंबईतील 5 हजार डबेवाले करत होते. मुंबई परिसरातील घराघरातून जवळपास 2 लाख डबे गोळाकरुन ते वेळेत पोहोचवण्याचं काम हे डबेवाले करत. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक कार्यालयं बंद आहेत. अनेकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. त्यामुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळलीय. मधल्या काळात व्यवसाय पुन्हा सुरु करण्यात आला. पण आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे डबे पोहोचवण्याचा काम बंद झालंय. बीकेसीतील डायमंड बाजारसारख्या महत्वाच्या भागात डबेवाल्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक डबेवाल्यांचा रोजगार बुडाला आहे. डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद झाला असला तर पोटाची भूक बंद होत नाही. अशावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक डबेवाल्यांनी आता हमाली, तसंच सुरक्षा रक्षकाची नोकरी धरली आहे.

डबेवाले, सलून चालकांना मदत द्या- पटोले

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. काँग्रेसकडूनही या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरीब जनतेसाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये अजून काही घटकांना समावेश करणं गरजेचं आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना त्याबाबत एक पत्रही लिहिलं आहे.

राज्य सरकारने घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये शेतकरी, सलून व्यवसायिक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले आणि छोटे व्यवसायिक यांचा समावेश करावा अशी, विनंती पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलीय.

बूट पॉलिशवाल्यांचीही उपासमार

दुसरीकडे रेल्वे स्थानक, बस स्टॅन्ड आदी ठिकाणी बसलेले बूट पॉलिशवालेही आता उपासमारीचा सामना करत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कामावर जाणाऱ्यांची संख्या कमी झाली. रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म, बस स्थानकं ओस पडली आहे. त्यामुळे बूट पॉलिशवाल्यांचा धंदाही पूर्णपणे बुडाला आहे. एरवी दिवसांला जास्तीत जास्त 200 ते 300 रुपये मिळवून घर चालवावं लागत होतं. आता दिवसाला 50 रुपये मिळणंही कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे आता गावी जाण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं मध्य प्रदेशातील उमेश साकेश याने लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’चं भुजबळांकडून कौतुक, केंद्राकडे मदतीची मागणी, भाजप नेत्यांची टोलेबाजी

ब्रेक दि चेन: बाहेरगावी प्रवास करु शकतो का? निर्बंधांबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे