प्रफुल्ल पटेल यांचा सर्वात मोठा दावा, शरद पवार फक्त नामधारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असतील, असं म्हटलं. तर दुसरीकडे त्यांनी घेतलेले निर्णय लागू होतील का? या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांचा सर्वात मोठा दावा, शरद पवार फक्त नामधारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष?
Chetan Patil | Updated on: Jul 03, 2023 | 6:17 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ज्या काही घडामोडी घडल्या आहेत ते पाहता पक्षात उभी फूट पडली आहे, हे चित्र सध्या दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत बंड पुकारलेल्या गटाने पक्षाचं चिन्ह आणि नावावर दावा केला आहे. अजित पवार यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा तोच दावा केला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फची कारवाई केली आहे. त्यामुळे पक्षातच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अजित पवार यांच्या गटाने आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ठरवले आहेत. त्यांनी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित केलं आहे. तर युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान अजित पवार यांच्या गटाच्या पत्राकार परिषदेत शरद पवार यांनी घेतलेले निर्णय लागू होतील की नाही? असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं.

प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?

“शरद पवार यांनी घेतलेले निर्णय लागू होणार नाहीत. त्याचं कारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप सारे म्हणजे बहुसंख्य लोकांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. लोकशाहीमध्ये बहुमताने घेतलेले निर्णय अवैध आहे किंवा कुणी त्याला बदलू शकतं, असं नाही. जसं अजित पवार यांनी सांगितलं की, कधी वाद होतो. असा वाद होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

“कुठलाही वाद होऊ नये, अशी आमची इच्छा नाही. आम्ही मनापासून त्यासाठी प्रयत्नसुद्धा करणार की, हे वाद होऊ नये. कुठलाही प्रश्न निर्माण झाला त्याचा अंतिम निर्णय कोण काढेल? आम्ही तर काढू शकत नाहीत ना? त्यावेळेस जसं अलिकडच्या काळात निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतं. कुणाचा अधिकार आहे आणि त्याचा कसा वापर करायचा? हा आमचा नाही त्यांच्याकडे अधिकार असतो. पण आम्ही वाद होऊ नये, अशी आमची इच्छा आहे”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

“तुम्ही आम्हाला विचारता, पण आमच्याकडे आमदार असल्याशिवाय अजित पवार यांची काल शपथ झाली नसती ना? आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्ही संख्या सांगत नाही आहोत. जे लोकं क्लेम करत आहेत त्यांनी सांगावं की, त्यांच्याकडे किती लोकं आहेत? बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत”, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.

“आमची शरद पवार यांना हात जोडून विनंती आहे की, पक्षाचे बहुसंख्य आमदार, दिग्गज नेते, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या इच्छांचा त्यांनी आदर करावा. जे चित्र सध्या दिसत आहे ते आता समाप्त झालं आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्यासह संपूर्ण पक्षावर असेल”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us