मुंबई : राज्यात सध्या कोरोनाचा लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे कोरोना लस आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन आता राज्यात जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. (Shortage of corona vaccine, while black market of remdesivir injection)
राज्यात कालपासून अनेक भागात कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. तर पुण्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परतावं लागल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. पिंपरी-चिंचवडमधील लसीकरण केंद्रांवरही आज पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक होता.
मुंबईतही बीकेसी सारख्या मोठ्या कोविड सेंटरमध्ये फक्त 5 हजार लसींचा साठा शिल्लक होता. उद्या सर लस आली नाही तर हे लसीकरण केंद्र बंद ठेवावं लागणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. शासकीय रुग्णालयातही लस उपलब्ध नाही. लसीकरण केंद्रांवरुन अनेक नागरिक लस न घेतात परत जात आहे. रत्नागिरी, चिपळूण, दापोली, गुहागर तालुक्यातही हिच स्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उद्यापर्यंत पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तिकडे कोल्हापुरात आज फक्त दोनच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होती. लसी अभावी शहरातील 9 केंद्र बंद करावी लागली आहेत. लस घेण्यासाठी लोकांची धडपड पाहायला मिळतेय. पण लसीचा साठाच शिल्लक नसल्यानं नागरिकांना केंद्रावरुन लस न घेताच माघारी परतावं लागत आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात कालपासूनच लसीकरण पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.
गोंदिया जिल्ह्यातही आता पुढील चार दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागणार आहेत. तर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातही उद्यापर्यंत पुरेल एवढेच लसीचे डोस उपलब्ध आहेत. राज्यातील बहुतांश भागात हिच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.
एकीकडे कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिव्हीर इंजेक्शन तब्बल 6 ते 8 हजार रुपयांना विकलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी छापे टाकून प्रशासनाने हा प्रकार उघडकीस आणला आहे.
नांदेडमध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये रेमडेसिव्हीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जादा दराने रेमडेसिव्हीरची विक्री करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात इंजेक्शन जप्त केले आहेत. आरोपींकडून तब्बल 8 हजार रुपयांना एका इंजेक्शनची विक्री करण्यात येत होती.
सोलापुरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हुमा मेडिकल बाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी रांग पाहायला मिळाली. रात्री 9 वाजल्यापासून अनेक रुग्णांचे नातेवाईक मेडिकल बाहेर रांगा लावून उभे आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत स्टॉक न आल्याने अनेकजण औषधांसाठी प्रतीक्षा करत होते. (Shortage of corona vaccine, while black market of remdesivir injection)
नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख फार्मा बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे दुकान बंद तर दुसरीकडे फार्मा कंपन्यां बाहेर तुफान गर्दी अस चित्र बघायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात 5741 रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज आहे. सध्या या ठिकाणी फक्त 5820 उपलब्धता आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. खासगी रुग्णालयात आणि औषधी दुकानातील साठा संपला आहे. उस्मानाबादमध्ये अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळेना झाल्याने त्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक यांची मोठी धावपळ होत आहे. तसंच लातूर, सोलापूर जिल्ह्यातूनही रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळेना झाले आहे. कोरोना झालेल्या एका रुग्णाला किमान 5 ते 6 डोस लागतात. मात्र एकही डोस मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या 7 कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. राज्यात रेमडेसिव्हीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावं. रुग्णालयात रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमण्यात यावेत. उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच इंजेक्शनचा पुरवठा करावा. तसंच काळाबाजार होऊ नये म्हणून एमआरपी कमी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. या बैठकीला अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
Shortage of corona vaccine, while black market of remdesivir injection