Ashish Shelar : आशिष शेलार यांना पुन्हा का मिळाले मुंबई भाजपाचे अध्यक्षपद?, मुंबई महापालिका निवडणुकांची धुरा,जाणून घ्या 5 कारणे

| Updated on: Aug 12, 2022 | 3:46 PM

2017 मुंबई महापालिका निवडणुकीतही आशिष शेलार यांच्याकडेच जबाबदारी होती. त्या निवडणुकीत मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने 33 जागांवरून तब्बल 83 जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. राज्यातील सत्ताबदलानंतर आता मुंबई महापालिका हे भाजपाचे पुढचे महत्त्वाचे लक्ष्य आहे, त्यासाठी आशिष शेलार यांची पुन्हा एकदा मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीआहे. कोणत्या पाच कारणांमुळे त्यांना ही संधी मिळाली हे जाणून घेऊयात.

Ashish Shelar : आशिष शेलार यांना पुन्हा का मिळाले मुंबई भाजपाचे अध्यक्षपद?, मुंबई महापालिका निवडणुकांची धुरा,जाणून घ्या 5 कारणे
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई – एकनाथ शिंदे आणि भाजपा सरकारच्या (CM Eknath Shinde)मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर, आता भाजपात संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. चंद्रकांत दादा पाटील आणि मंगल प्रभात लोढा यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आल्यानंतर, आता महाराष्ट्र प्रदेश भाजपा आणि मुंबई भाजपाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर मुंबई भाजपाचे अध्यक्षपद (Mumbai BJP president)पुन्हा एकदा माजी शिक्षणमंत्री आणि वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar)यांच्याकडे देण्यात आले आहे. 2017 मुंबई महापालिका निवडणुकीतही आशिष शेलार यांच्याकडेच जबाबदारी होती. त्या निवडणुकीत मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने 33 जागांवरून तब्बल 83 जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. राज्यातील सत्ताबदलानंतर आता मुंबई महापालिका हे भाजपाचे पुढचे महत्त्वाचे लक्ष्य आहे, त्यासाठी आशिष शेलार यांची पुन्हा एकदा मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीआहे. कोणत्या पाच कारणांमुळे त्यांना ही संधी मिळाली हे जाणून घेऊयात.

1. मुंबई महापालिकेची चांगली ओळख

आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवकपदापासून राजकारणाची सुरुवात केलेली आहे. मुंबई महापालिकेच्या कामकाजाची आणि खाचाखोचांची चांगली माहिती त्यांना आहे. मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेत भाजपा नगरसेवकांचे गटनेते, सुधार समितीचे अध्यक्षपद भू्षविले आहे, एमएमआरडीए, मुंबई मेट्रो याचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यानंचर सलग दोन वेळा त्यांनी वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून आमदारकीही जिंकलेली आहे.

2. मुंबईच्या प्रश्नांची जाण, मुंबईत संघटनात्मक कार्य

मुंबईकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत, याची आशिष शेलार यांना चांगली जाण आहे. तसेच मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून सन 2013 पासून दोन टर्म ( सात वर्षे) काम करुन त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. विविध उपक्रम, आंदोलने आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे असल्याने भाजपातील एक सर्व समावेशक आणि आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सतत मुंबईकरांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार नेता अशी त्यांची ओळख असून गणेशोत्सव मंडळे, दहिकाला उत्सव मंडळे, नवरात्र उत्सव मंडळे यांचे वेळोवेळी प्रश्न सोडवून या पारंपारिक उत्सवांची परंपरा टिकली पाहिजे यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत लढत दिली.

हे सुद्धा वाचा

3. संघटनात्मक कौशल्य

२०१७च्या मुंबई महापालिका निवडणुकांवेळी आशिष शेलार यांचे संघटनात्मक कौशल्य सगळ्यांनीच अनुभवले आहे. य़ा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मुंबईेत संघटनेची मजबूत फळी उभी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. त्या संघटनात्मक कामाच्या अनुभवाचा फायदाही त्यांना झाला. यातूनच त्यांनी 2017 साली शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. आशिष शलार हे कोकणातील आहेत. शिवसेनेसोबत असलेला मोठा वर्गही कोकणातलाच आहे. त्यामुळे कोकणी माणूस मुंबई भाजपाचा चेहरा झाल्याने त्याचाही फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे.

४. अमित शाहा, फडणवीस यांचे विश्वासू

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे विश्वासू अशीही आशिष शेलार यांची ओळख आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी मिळवलेल्या यशानंतर अमित शाहा यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरलेले आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळात स्थान न देता त्यांना संघटनात्मक पातळीवर अधिकाधिक जबाबदार देण्यात येत आहेत. देवेंद्र फडमवीस यांच्याही ते मर्जीतले मानले जातात. राज्यसभा, विधान परिषद निवडणूक, शिंदे यांचे बंड या सगळ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना अखेरच्या वर्षी संधी मिळाली होती. त्यापूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वगुणाचा कस लागला होता. आगामी काळात मुंबई महापालिकेत यशानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते.

5. शिवसेनेला रोखू शकणारा मराठी नेता

आशिष शेलार यांच्या रुपाने मराठी नेता, मराठा नेता मुंबई भाजपाचा चेहरा म्हणून उभा करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. शिवसेनेला थेट अंगावर घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांमध्ये आशिष शेलार यांचा समावेश होतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. तसेच शेवटच्या क्षणी पक्षासाठी आवश्यक फोडाफोडी करण्याची तयारी असलेला नेता अशीही त्यांची ओळख आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी हे सर्वांना दिसलेही होते. त्यामुळेच आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ही मुंबई महापालिका लढवण्याचे भाजपाने ठरवलेले दिसते आहे.

भाजपासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेली मुंबई महापालिका निवडणुकांची धुरा आशिष शेलार यांच्याकडे देऊन भाजपाने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे. राज्याच्या आगामी काळातील भाजपातील मोठे नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न यामागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.