वंचितचा महाविकास आघाडीला फायदा किती?, वंचितमुळे भाजपचा खिमा होणार?; आकडे काय सांगतात?

| Updated on: Jan 23, 2023 | 2:10 PM

वंचित बहुजन आघाडीमुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 30 जागांवर फटका बसला होता. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी त्याची कबुली दिली.

वंचितचा महाविकास आघाडीला फायदा किती?, वंचितमुळे भाजपचा खिमा होणार?; आकडे काय सांगतात?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटामध्ये अखेर युती झाली आहे. दोन्ही पक्ष आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. वंचितच्या रुपाने महाविकास आघाडीत नवा भिडू आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढली असून भाजपची डोकेदुखी वाढली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचितचा प्रयोग करून आपली वेगळी ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची बेगमी केली होती. अनेक ठिकाणी तर वंचितने दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन सर्वच राजकीय विश्लेषकांना तोंडघशी पाडलं होतं. त्यामुळे आता वंचित महाविकास आघाडीच्या तंबूत आल्याने भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे.

वंचित बहुजन आघाडीने 2019ला विधानसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी वंचितने 288 जागांपैकी 234 जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत वंचितला 10 जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. बुलढाणा, अकोट, बाळापूर, अकोला पूर्व, मुर्तिजापूर, वाशिम, लोहा, कळमनुरी, परभणी, सोलापूर शहर उत्तरमध्ये वंचितला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. तर अनेक मतदारसंघात वंचितने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसला सर्वाधिक फटका

राज्यातील जवळपास 21 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी आणि पराभूत उमेदवार यांच्या मतातील फरकाहून अधिक मतं मिळाली होती. अकोला पूर्वमधून वंचितचे हरिदास भदे हे केवळ 2440 इतक्या मतांनी पराभूत झाले होते. वंचितने उमेदवार दिल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला होता.

त्यानंतर राष्ट्रवादीला वंचितच्या उमेदवारांची झळ पोहोचली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षाचा विजयी उमेदवारांचा आकडा कमी झाला आणि त्याचा फायदा भाजपला झाला होता.

लोकसभेत सात ठिकाणी पराभव

वंचितने लोकसभेच्या 47 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी वंचितला एकही जागा जिंकता आली नव्हती. वंचितची एमआयएमसोबत युती होती. त्यामुळे वंचितमुळे एमआयएमचे औरंगाबादमधील उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले होते. वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला लोकसभा निवडणुकीत 7 ठिकाणी फटका बसला होता. तर प्रकाश आंबेडकर सोलापुरातून उभे राहिल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता.

ताकद वाढणार

लोकसभेला 7 आणि विधानसभेला 10 ठिकाणी वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थेट फटका बसला होता. अनेक ठिकाणी मत विभागणी झाल्यामुळे त्याचा फायदा भाजपला झाला होता. आता वंचित महाविकास आघाडीत आल्याने त्याचा फायदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार असून भाजपला मोठा फटका बसणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

नवा प्रयोग फसणार?

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. ही आघाडी सत्तेत आल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली होती. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाली. भाजपने शिंदे यांच्याशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली.

त्यामुळे या नव्या प्रयोगाने उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपुष्टात येईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता वंचितने उद्धव ठाकरे यांना हात दिल्याने राज्यातील राजकीय समीकरणेच बदलली आहेत. या नव्या राजकीय समीकरणामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचा प्रयोग फसणार का? अशी चर्चा आता रंगताना दिसत आहे.

मनसेशिवाय पर्याय नाही

दरम्यान, वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीमुळे महाविकास आघाडी मजबूत झाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाला आता या महाविकास आघाडीला रोखायचं असेल तर मनसेला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आगामी काळात मनसे भाजपसोबत जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विदर्भ, मराठवाड्यात शिवसेनेला फायदा?

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने विदर्भ आणि मराठवाड्यात चांगली कामगिरी केली होती. त्यातही विदर्भात वंचितची चांगली कामगिरी झाली होती. त्यामुळे वंचितसोबत आघाडी केल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेची विदर्भ आणि मराठवाड्यातील ताकद वाढणार आहे. पक्षातील बंडानंतर विदर्भातील शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हं उभे राहिले होते. आता आंबेडकर सोबत आल्याने ठाकरे गटात पुन्हा चैतन्य निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

वंचितमुळे 30 हून अधिक जागांचा फायदा होणार?

वंचित बहुजन आघाडीमुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 30 जागांवर फटका बसला होता. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी त्याची कबुली दिली. आता वंचित महाविकास आघाडीत आल्याने आणि शिवसेनाही महाविकास आघाडीतच असल्याने विधानसभा निवडणुकीत या आघाडीला 30 हून अधिक जागांचा फायदा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.