नावालाच धरणांचा जिल्हा, हंडाभर पाण्यासाठी करावी लागते कोसो दूर पायपीट, इगतपुरीत पाण्याचं भीषण वास्तव

| Updated on: May 09, 2023 | 4:13 PM

खरंतर नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, साठवणी करिता मोठ्या प्रमाणात धरण बांधण्यात आले आहे. तरी देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकलेली नाही. त्यामुळे इगतपुरीतील हे भीषण वास्तव कधी मिटणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. 

नावालाच धरणांचा जिल्हा, हंडाभर पाण्यासाठी करावी लागते कोसो दूर पायपीट, इगतपुरीत पाण्याचं भीषण वास्तव
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : धरण उशाला आणि कोरड घशाला अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील महिलांना दरवर्षी येतो. पाण्यासाठी डोंगरदऱ्या कड्या-कपाऱ्यांवर अक्षरशः पाण्याचा शोध घ्यावा लागतो. काही ठिकाणी तर अक्षरशः दगडांमधून झिरपणाऱ्या पाण्याच्या थेंबांची साठवण करून हंडा भरला जातो. त्यामुळे त्यासाठी कमीत कमी एक ते दोन तास एका महिलेला लागतो. अशा सर्व महिलांचे पाण्याचा हंडे भरले की सर्व महिला घराची वाट धरतात. खरंतर मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस पडतो. इतकेच काय धरणांचा तालुका म्हणून इगतपुरीची ओळख आहे. जवळपास 16 धरणे या तालुक्यात आहे. अशी सर्व परिस्थिती असतांना इगतपुरी तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

इगतपुरी तालुका हा धरणाचा तालुका म्हणून ओळखला जातो. इगतपुरी तालुक्यात सोळा धरण असूनही आदिवासी पाड्यांवरील महिलांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी हा आदिवासी पाडा भावली धरणापासून जवळच आहे.

मात्र येथील महिलांना जंगलातून पायपीट करत डोंगर दऱ्यातील कपारीतून डबक्यात झिरपणारे पाणी प्यावे लागत आहे. धरण उशाला अन्  कोरड घशाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. खरंतर भारताला स्वातंत्र मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. त्याच पार्श्वभूमीवर अमृतमोहत्सवी वर्षे साजरा केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र, दुसरीकडे बहुतांश नागरिकांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाही. अनेक गावांना पाण्यासाठी पाच ते दहा किलोमीटर पायी जावे लागत आहे. नागरिकांना जवळ धरण असूनही पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पाण्याच्यासाठीची ही वणवण आदिवासी महिलांना नित्याचीच झाली आहे.

खरंतर नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, साठवणी करिता मोठ्या प्रमाणात धरण बांधण्यात आले आहे. तरी देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकलेली नाही. त्यामुळे इगतपुरीतील हे भीषण वास्तव कधी मिटणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.

खरंतर आदिवासी भागात आजही मूलभूत सुविधा नाही. त्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी सरकारच्या विविध योजना असूनही त्या अजून पोहचल्या नाहीत. देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्षे झाली तरी देखील मूलभूत सुविधा मिळू शकत नसतील तर यासारखं ते दुर्दैवं काय?

सध्या या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत असून जिल्हा प्रशासन याबाबत काय पाउलं उचलतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.