नाशिकः अगदी पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या द्राक्षबागेवर नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या ठाणगाव येथील शेतकऱ्याने कुऱ्हाड चालवली. कोरोनामुळे दोन वर्ष झालेले नुकसान आणि त्यात या वर्षी लोडशेडिंग ते थेट कुज, निसर्गाचा लहरीपणा यामुळे किमान दहा लाखांचे नुकसान झाले. हा तोटा कुठपर्यंत सहन करायचा म्हणत शेवटी वैतागलेल्या शेतकऱ्याने एक एकर द्राक्षबाग (Vineyards) मजूर लावून तोडली आहे. पंचक्रोशीत या घटनेची चर्चा सुरूय. दुसरीकडे इतर शेतकऱ्यांचेही सध्या हाल सुरू आहेत. अनेकांच्या शेतात पाणी आहे. मात्र, उभे पीक लोडशेडिंगमुळे जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. कधी नैसर्गिक संकट तर कधी कृत्रिम संकट. शेतकरी (Farmer) नेहमी भरडला जातो. त्याला नुकसान भरपाईसह विविध पॅकेजच्या घोषणा केल्या जातात. मात्र, कोणीही वेळेवर वीज, पाणी आणि इतर सुविधा देऊ म्हणत नाही, अशी खंतही या निमित्ताने शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत.
ठाणगाव येथील द्राक्ष उत्पादनक शेतकरी देविदास शेळके आणि रूपेश शेळके यांनी एक एकरवर द्राक्षबागेची उभारणी केली होती. मात्र, सलग तीन वर्षांपासून हे पीक तोट्यामध्ये जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यात कोरोनमुळे सलग दोन वर्ष द्राक्ष विक्री झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचे शेळके यांनी म्हटले आहे.
यंदाच्या वर्षी फळधारणा चांगली झाली. मात्र अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षात कुज झाली. परिणामी उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले. सतत नुकसानीचा फेरा. त्यात यावर्षी लोडशेडिंगनेही हैराण केले. एक तर दरवर्षी लाखो रुपये फवारणी, औषधी आणि मजुरांवर खर्च करायचे. मात्र, हाती काहीही नाही. या फेऱ्याला कंटाळून शेळके यांनी द्राक्ष बाग तोडून टाकली. शेळके हे एक प्रतीक आहेत. इतर अनेक शेतकऱ्यांचीही त्यांच्यासारखीच अवस्था झालीय.
मी आज द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली. गेल्या तीन वर्षांपासून सतत लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कोरोनाकाळात नुकसान झाले. त्यानंतर गेल्यावर्षी आणि यावर्षीही नुकसान झाले. कधी निसर्गाचे संकट तर कधी कृत्रिम संकट. यंदा कुजीने उत्पादन कमी झाले. त्यामुळे कंटाळून बागच तोडून टाकली.
– देविदास शेळके, शेतकरी