Nashik Rain Update | नाशिककरांची चिंता वाढवणारी बातमी, धरणात फक्त इतका पाणीसाठी शिल्लक
Nashik Rain Update | नाशिकमध्ये दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार सरी बरसतात. यावेळी मात्र स्थिती वेगळी आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. पावसाने नाशिकला ओढ दिली आहे.
नाशिक : सध्या उत्तरेकडे पावसाने हाहाकार माजवलाय. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि दिल्लीमध्ये नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. मनाचा थरकार उडवणारे व्हिडिओ पाहायला मिळाले. बस, ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसले. पाण्याच्या प्रचंड दबावामुळे अनेक घर, इमारती. जमीनदोस्त झाल्या. उत्तरेकडच्या राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. अनेक नागरिक आपल्या प्राणांना मुकले. दिल्लीमध्ये 1978 नंतर पहिल्यांदाच भीषण पूरस्थिती निर्माण झाली. दिल्लीचे अनेक भाग 3 ते 4 दिवस पाण्यात होते.
उत्तरेकडे ही स्थिती असताना त्या तुलनेत अजून महाराष्ट्रात पावसाचा प्रकोप पाहायला मिळालेला नाही. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडल्यास राज्याच्या अन्य भागात विदर्भ, नाशिक, मराठवाडा येथे म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.
नाशिकमध्ये चिंताजनक स्थिती
शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. कारण पावसावर शेती, पीकं अवलंबून आहेत. नाशिक हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथे दरवर्षी जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळतो. गोदावरी काठची मंदिर पाण्य़ाखाली जातात. पूर सदृश्य स्थिती असते. पण यावेळी मात्र चित्र वेगळं आहे. नाशिकमधील धरणात किती टक्के पाणीसाठा?
नाशिक जिल्ह्याला पावसाने ओढ दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे प्रशासन, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गंगापूर धरणात 39, कश्यपी 20, तर गौतमी धरणात 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहरात आतापर्यंत केवळ 113 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यातील ही स्थिती चिंता वाढवणारी आहे. पुढच्या काही दिवसात नाशिकमध्ये पाऊस झाला नाही, तर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. मागच्या वर्षी जुलैच्या पंधरवड्यात गोदावरीला पूर आला होता.
–