मालेगाव : मालेगावच्या (Malegaon) मोसम नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडालीयं. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मालेगाव शहरातील पूर्व भागात असलेल्या काही कत्तलखान्यातून रक्तमिश्रित पाणी हे नेहमी ड्रेनेजव्दारे मोसम नदी (Monsoon River) पात्रात सोडले जाते. मात्र ड्रेनेज चोकअप झाल्याने हे पाणी थेट सरदार चौकातून खाली येत सांडवा पूलावर आल्याने येथील व्यावसायिकांची चांगलीच अडचण झाली आहे. या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. मनपा प्रशासनाकडे (Administration) यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
शहराच्या मध्यभागी असलेल्या मोसम नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी वाहण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. नदीच्या जवळच लोकांची घरे असल्यामुळे पाण्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली या मुद्दावर अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. इतकेच नाही तर कत्तलखान्यातील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असे आश्वासन मनपा प्रशासनाकडूनही देण्यात आले. मात्र, अद्यापही प्रश्न सुटलेला नाहीयं.
आंदोलने होत असली तरीही नदीपात्र रक्तमिश्रित पाणी अधूनमधून वाहतच असते. रविवारी सकाळी अचानक लाल रंगाच्या पाण्याचा थर नदीपात्रात दिसला. काही वेळानंतर सांडवा पुलावरुन पाणी वाहू लागले. नागरिकांचा संताप झाल्याने अनेकांनी मनपा प्रशासनाला याबद्दल विचारणा केली. या प्रकारामुळे मनपा व पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये पाण्याचे व्हॉल्व्हमधून पाणी सोडण्यात आले. वाहत्या पाण्यामुळे रक्तमिश्रीत पाणी नदीपात्रात वाहून गेले. या प्रकारामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यव झाला.