Nitish Kumar Birthday | जयप्रकाशांचा अनुयायी, सुशासन बाबू ते हाडाचा राजकारणी; नीतीश कुमारांचा प्रवास!

| Updated on: Mar 01, 2022 | 9:07 AM

नीतीश कुमार नेहमी म्हणतात, मला लोकनायक जयप्रकाश नारायण, सत्येंद्र नारायण सिन्हा आणि जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या पायाजवळ खूप काही शिकायची संधी मिळाली. मात्र, राजकारणात ते ही अनेकदा इतरांसारखे वागले. तरीही बिहारची जनता त्यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहते. हेच त्यांचे यश म्हणावे लागेल. आज नीतीश यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाची ही थोडक्यात ओळख.

Nitish Kumar Birthday | जयप्रकाशांचा अनुयायी, सुशासन बाबू ते हाडाचा राजकारणी; नीतीश कुमारांचा प्रवास!
नीतीश कुमार.
Follow us on

नाशिकः जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस यांचे ते निस्सीम चाहते. त्यांच्या प्रभावमुळेच त्यांची पावले राजकारणाकडे वळली. बिहारचे मुख्यमंत्री (Chief Minister), केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक खात्याचा कारभार आणि जनता दल संयुक्तचे खणखणीत नाणे, ही नीतीश कुमार (Nitish Kumar) यांची ओळख.आज त्यांचा वाढदिवस. नीतीश कुमार हे नाव उच्चारताच डोक्यावरचे पांढरे शभ्र केस, खुरटी पांढरी दाढी आणि ओठावर नाजुक स्मितहास्य असलेला चेहरा आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. त्यांचा जन्म 1951 मध्ये बिहारमधल्या (Bihar) बख्तियारपूर येथे झाला. वडील स्वातंत्र्य सैनिक आणि सुप्रसिद्ध गांधीवादी नारायण सिन्हाच्या जवळचे. त्यांची आयुर्वेदाचार्य म्हणूनही ओळख होती. त्यांच्या मुलाने अभियांत्रिकी पदवी घेतली. काही काळ बिहारच्या वीज बोर्डात नोकरी केली. मात्र, मन सारखे राजकारणाकडे ओढ घ्यायचे. शेवटी त्यांनी राजकारणात प्रवेश केलाच.

संपूर्ण क्रांतीच्या हाकेने वेडे

नीतीश कुमारांचे शिक्षण सुरू होते, तेव्हाची गोष्ट. त्यावेळी जयप्रकाश नारायणांच्या संपूर्ण क्रांतीच्या हाकेने अनेक तरुण वेडे झालेले. त्यात नीतीश कुमार एक. त्यांनी 1974 ते 1977 मध्ये या आंदोलनात भाग घेतला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते सत्येंद्र नारायण सिन्हा यांचे ते खूप जवळचे म्हणून ओळखले जात. नीतीश कुमार 1985 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1987 मध्ये युवा लोकदलाचे अध्यक्ष, 1989 मध्ये त्यांची बिहारच्या जनता दलाच्या सचिवपदी निवड झाली. त्याच वर्षी ते खासदारही झाली. मोठ्या झोकात सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास पुन्हा कधी थांबलाच नाही.

सात तासांत राजीनामा दिला

1990 मध्ये त्यांची पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाली. वाट्याला आले कृषि राज्यमंत्री पद. पुढे त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक पदे भूषविली. महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला. ऑगस्ट 1999 मध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 2000 मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. मात्र, राजकीय फासे असे पडले की, त्यांना अवघ्या सात दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर चार वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हे दोन्ही झटके बसल्यानंतरही नीतीश कुमार तितक्याच तडफेने काम करत राहिले.

तरीही आशेचा किरण

अखेर तो काळ आलाच. 2005 मध्ये त्यांनी चमत्कार केला. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत ठाण मांडून बसलेल्या राष्ट्रीय जनता दलाला पराभूत केले. अन् मुख्यमंत्री पदाचा मुकुट डोक्यावर चढवला. त्यांनी बिहारमध्ये चांगली कामे केली. त्याच बळावर 2010 ची निवडणूक लढवली. त्यातही जिंकले. पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांची सुशासनबाबू ही ओळख बिहारमध्ये झाली. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने निराशाजनक कामगिरी केली. यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला, असे हे आगळेवेगळे नीतीश कुमार. सध्या तेच बिहारचे मुख्यमंत्री आहे. नीतीश कुमार नेहमी म्हणतात, मला लोकनायक जयप्रकाश नारायण, सत्येंद्र नारायण सिन्हा आणि जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या पायाजवळ खूप काही शिकायची संधी मिळाली. मात्र, राजकारणात ते ही अनेकदा इतरांसारखे वागले. तरीही बिहारची जनता त्यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहते. हेच त्यांचे यश म्हणावे लागेल.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान