Sion-Panvel : सकाळी 7 ते 11, संध्या 5 ते रात्री 9! नवी मुंबईत अवजड वाहनांना बंदी, वाहतूक कोंडीमुळे निर्णय

| Updated on: Jul 24, 2022 | 7:37 AM

Navi Mumbai News : वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार?

Sion-Panvel : सकाळी 7 ते 11, संध्या 5 ते रात्री 9! नवी मुंबईत अवजड वाहनांना बंदी, वाहतूक कोंडीमुळे निर्णय
वाहतूक कोंडी फुटणार?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी मुंबई : ऐन वाहतूक कोडींच्या वेळा अवजड वाहनांचा फटका बसत असल्यानं अखेर नवी मुंबईकरांना (Navi Mumbai News) दिलासा देणारा एक निर्णय घेण्यात आलाय. नवी मुंबईत अवजड वाहनांना (Heavy vehicles on Sion Panvel Highway) एका ठराविक वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांच्या कामाच्या वेळा पाहता अवजड वाहनांना सकाळी आणि संध्याकाळी ट्रॅफिकच्या वेळी प्रवेश नाकारण्यात (No entry) आला आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला असून आता नवी मुंबईतील हायवेवरील वाहतूक कोंडी फुटते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. नवी मुंबईतील वाहतूक विभागाकडे तसे स्पष्ट आदेशही जारी करण्यात आले आहे. तब्बल आठ तास नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

शनिवारी वाहतूक कोंडी…

विकेंडला नवी मुंबईत सायन-पनवेल महामार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. मुंबईच्या दिशेने आणि मुंबईच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा वेग मंदावतो. अशातच शनिवारी जुईनगरमध्ये बंद पडलेल्या कंटेनरमुळे अधिकच कोंडी झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी वाहनं बंद पडल्यास वाहतूक कोंडी वाढत जाते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

दरम्यान, सकाळी आणि संध्याकाळी खासगी आणि शासकीय सेवेतील कर्मचारी तसंच विद्यार्थी यांच्यासाठीही सायन पनवेल हा प्रवासाचा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका लोकांना बसतो. त्यामुळे अखेर वाहतूक विभागाच्या अप्पर आयुक्तांनी मुंबईत सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार, असे एकूण दिवसभरात आठ तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतलाय.

हे सुद्धा वाचा

प्रवेशबंदीने वाहतूक कोंडीत भर?

दुसरीकडे मुंबईत आठ तास प्रवेश मिळत नसल्यामुळे अवजड वाहनं ही वाशी टोल नाक्याजवळ डाव्या बाजूस थांबून असतात. या टोल नाक्या जवळ अवजड वाहनांची एका बाजूला रांगच लागते. या मुळेही वाशी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे अखेर आता नवी मुंबईतही आठ तास अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटून वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास वाहतूक विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय.