मुंबई : ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन खरमरीत टीका केल्यानंतर त्याला आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. मंत्री नवाब मलिक यांनी शेलारांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केलाय. दोन वर्षाच्या काळात सरकार अनेक समस्यांना तोंड देत सरकार इथपर्यंत पोहोचलं. कोविड काळात राज्य सरकारने केंद्रापेक्षाही चांगलं काम केलं. असं मलिक म्हणालेत. तिथे मृतदेह नदीत वाहत होते, पण इथे आम्ही रुग्णांना वाऱ्यावर सोडलं नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केलीय.
पब, पार्टीत कोण असतं बोलायला लावू नका
पब, पार्टी, आणि पेग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली अशी टीका शेलार यांनी केली. त्यावर बोलताना पब, पेग आणि पार्टीत सरकार मग्न म्हणता, पार्टीत कोण असतं, पबला कोण असतं, हे ऊद्यापासून आम्हाला काढायला लावू नका, आमच्याकडे सगळ्यांची माहीती आहे. असं प्रत्युत्तर मलिक यांनी दिलंय. आशिष शेलार यांना एवढंच सांगायचंय की आम्ही कुणाला घाबरत नाही, असंही मलिक म्हणालेत.
दोन वर्षे सरकार पडेल असं बोलून भाजप थकलं
दोन वर्षे सरकार पडेल असं बोलून भाजप थकलं आत्ता बोलायला काही राहीलं नाही, असा टोला नवाब मलिक यांनी आशिष शेल यांना लगावलाय. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कुंणालाही सरकार स्थापन करता येत नाही. हे भाजपला आत्तापर्यंत कळायला हवं होतं, आम्ही ठाम आहोत सरकार चालेल, आणि काहीही झालं तरी पडणार नाही, असंही मलिक यांनी ठणकावून सांगितलंय. त्यामुळे शेलार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वातावरण पुन्हा जोरदार तापलंय.