जालना: महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर शनिवारी सकाळपासून राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरूवात झाली आहे. लसींचा साठा मर्यादित असल्याने मोजक्याच केंद्रांवर लसीकरण पार पडेल. तसेच आज केवळ 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांनाच लस मिळेल. 45 वर्षांवरील नागरिकांसाठी आज लसीकरण बंद असेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत केवळ पाच केंद्रांवरच लसीकरण केले जाईल. तर पुण्यात 20 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. (Health Minister Rajesh Tope on Covid vaccination plan in Maharashtra)
यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. कोरोना लसीकरण अविरत सुरु ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला तात्काळ लसींचा पुरवठा करावा, असे टोपे यांनी सांगितले.
◆ प्रत्येक जिल्ह्यात पाच ठिकाणी सेशन घेण्यात येणार
◆मोठ्या जिल्ह्यांना 20 हजार लसी दिल्या आहेत, मध्यम शहरांना साडेतीन हजार लसी, छोट्या शहरांना 5 हजार लसी
◆ 7 दिवस पुरेल असे नियोजन जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने करावे.
◆ लसीच्या मर्यादेमुळे लसीकरणाची गती जाणीवपूर्वक कमी करावी लागेल.
◆ आज दिवसभरात प्रातिनिधीक स्वरूपात लसीकरणाला सुरुवात आणि हे लसीकरण 7 दिवस चालणार आहे
◆ लसीकरण न थांबता चालु रहावे म्हणून प्रयत्न करणार
सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी लसींचे डोस मागितले आहेत. मात्र, आतापर्यंत आपल्याला फक्त 3 लाख डोस मिळाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने लसीकरण करण्याचा मनसुबा राज्य सरकारला अंमलात आणता येणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला आता 3 लाख कोरोना लसींचा साठा दिला आहे. आता प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात लसीकरणासाठी आग्रही आहे. मात्र, लसींचे वाटप हे जिल्ह्यांची लोकसंख्या पाहूनच केले जाईल. लोकसंख्येच्या निकषामुळेच मुंबईच्या वाट्याला पुण्यापेक्षा अधिक कोरोना लसी आल्या, असे अजित पवार स्पष्ट केले.
संबंधित बातम्या:
लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती; अजितदादांचा केंद्राला टोला
(Health Minister Rajesh Tope on Covid vaccination plan in Maharashtra)