सांगली: साताऱ्याच्या प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतीविरांगणा हौसाताई पाटील यांचे आज कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे.हौसाताई पाटील यांच्या निधनानं स्वातंत्र्यलढ्यातील साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. हौसाताई पाटील स्वातंत्र्य लढ्यात देखील योगदान दिलं होतं. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या त्या एकमेव कन्या होत्या. सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील हणमंतवडिये येथे हौसाताई पाटील यांचं कुटुंब राहतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हौसताई पाटील यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. “वंचितांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना घरातूनच वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडून मिळाली होती. त्यातूनच जनतेच्या प्रश्नांवर सतत आवाज उठविण्याची भूमिका त्यांनी घेतली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि गोवा मुक्तिसंग्रामामध्ये देखील हौसाताई पाटील यांचे मोठे योगदान होते. संपूर्ण आयुष्य जनकल्याणाला समर्पित करणार्या हौसाताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.
हौसाताई पाटील यांच्या पश्चात मुलगा अॅड. सुभाष पाटील यांच्यासह इतर कुटुंबीय असा परिवार आहे.
वंचितांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना घरातूनच वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडून मिळाली होती. त्यातूनच जनतेच्या प्रश्नांवर सतत आवाज उठविण्याची भूमिका त्यांनी घेतली. pic.twitter.com/EdeXVODcVs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 23, 2021
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहेच. हौसाताईंचा जन्म 12 फेब्रुवारी 1927 रोजी सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र गावात झाला. हौसाताई तीन वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा प्रभाव हौसाताई पाटील यांच्यावर पडला. 1940 मध्ये हणमंतवडिये येथील मोरे घरण्यातील भाई भगवानराव पाटील यांच्याशी हौसाताईंचा विवाह झाला. ते देखील प्रतिसरकारच्या संपर्कात आल्यानं स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते.
ऑक्टोबर 1943 ला वांगीचा डाक बंगला जाळला तेव्हांची गोष्ट. या बंगल्यातील पोलिसांच्या हत्यारांबाबत वावराबाबत इत्यंभूत माहिती काढण्याची जबाबदारी हौसाताईवर सोपविण्यात आली होती. तेव्हा ती फक्त सात दिवसांची बाळंतीण होती. तान्हं बाळ घरी ठेवून भूमिगतांनी ठरवून दिलेल्या साथीदाराबरोबर अनवाणी पायांनी चालत तिने वांगी गाठली होती. ऐन थंडीचे दिवस होते. स्मशान भूमीतील पेटत्या चितेची उब घेत पोलिसांच्या या ठाण्याची टेहळणी केली. पोलिसांना सुगावा लागू न देता खबऱ्यांमार्फत निरोप आणि योग्य माहिती भूमिगतांना पोहोचवली आणि दुसऱ्या दिवशीच भूमिगतांनी ब्रिटीशांचे ठाणे जाळले. ब्रिटीशांना क्रांतिकारकांबद्दल दहशत, दरारा वाटावा म्हणूनच ती कामगिरी होती. अशा वेळी हवं तस नाट्य उभं करून आपणास हवी असलेली माहिती काढून घेण्यासाठी आणि पोलिसांच्या हातावर तुरी ठेवण्यासाठी हौसाताई भूमिगत चळवळीच्या हुकमी एक्का होती.
हौसाताई पाटील यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील हौसाताई पाटील यांनी सहबाग घेतला. कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांना न्याय मिळावा, यासाठी त्यात सतत शासन व्यवस्थेविरुद्ध लढत राहिल्या. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्या सतत संघर्ष करत राहिल्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य चळवळीच्या साक्षीदार असणाऱ्या हौसाताई पाटील यांचं आज निधन झालं आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा, साताऱ्याचं प्रतिसरकार, स्वातंत्र्यानंतरची कष्टकऱ्यांची आंदोलनं आणि सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळींना त्यांचं मार्गदर्शन मिळत असे. महात्मा गांधी यांचा विचार आपण जोपासला पाहिजे, असं देखील त्या सांगायच्या.
इतर बातम्या:
शिवसेना खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाला जिल्हा परिषदेचं तिकीट, स्थानिकांची मात्र नाराजी
मोदी सरकारचा चीनवर प्रहार, चिनी कंपन्यांना LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्यास बंदी
Freedom Fighter Krantivirangana Housatai Patil passes away in Karad Krishna Hospital