प्रकाश आंबेडकर यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं विधान, ठाकरे गटाशी दोस्ती, पण राष्ट्रवादी-काँग्रेससोबत राजकीय कुस्ती?

| Updated on: Jan 25, 2023 | 7:32 PM

"शिवसेनेला (Shiv Sena) काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) प्रतिसाद देत नाहीत. भाजप (BJP) आपली सत्ता टिकावी म्हणून ईडीला वापरतील. तुम्ही इकडे या नाहीतर फाईली ओपन करू. तसं ऑर्थर रोड जेल आहेच रिकामं", असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं विधान, ठाकरे गटाशी दोस्ती, पण राष्ट्रवादी-काँग्रेससोबत राजकीय कुस्ती?
Follow us on

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज शिवसेनासोबतच्या (Shiv Sena) युतीबद्दल एक मोठं विधान केलं आहे. “आमची युती ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) काहीच संबंध नाही”, असं स्पष्ट विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या युतीवरुन आनंद व्यक्त केला जातोय. प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढल्याचा दावा केला जातोय. पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला महाविकास आघाडीत जायचंच नाही, असं विधान केलं आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकीय घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेला जातील ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

वंचित बहुजन आघाडी पक्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरला होता. वंचितच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे वंचितचं शिवसेनेसोबत असणं आगामी काळासाठी दोन्ही पक्षांसाठी फार फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. असं असताना शिवसेना गेल्या तीन वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाबद्दल काय निर्णय घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 ‘शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी प्रतिसाद देत नाहीत’

“मी महाविकास आघाडीचा भाग झालो नाही. आणि माझी इच्छाही नाही. शिवसेना आणि वंचितची युती झाली आहे. सरकार पडण्याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना एकत्र होती. नाना पटोलेंनी वक्तव्य केलं की आम्ही स्वतंत्र जाणार आहोत. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी प्रतिसाद देत नाहीत. भाजप आपली सत्ता टिकावी म्हणून ईडीला वापरतील. तुम्ही इकडे या नाहीतर फाईली ओपन करू. तसं ऑर्थर रोड जेल आहेच रिकामं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘आमचा आणि महाविकास आघाडीचा काही संबंध नाही’

“आमची युती ही ठाकरेंबरोबर आहे. आमचा आणि महाविकास आघाडीचा काही संबंध नाही. मी कोणाचीच प्रतिक्षा करत नाही. आम्ही जाहीर केलंय 2024 च्या निवडणूका आम्ही एकत्र लढणार. कोण कोणाकडे आहे याचा ज्याचा त्यांनी विचार करायचा. मैत्री करायची तर प्रामाणिक करायची. प्रामाणिकता नसेल तर समझौता करायचा नाही”, असंदेखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील आणि केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीवरदेखील प्रतिक्रिया मांडली. “आपल्यावरती कोणी राज्य करू शकत नाही. भारत हा स्वायत्त आहे. संसद आणि विधानसभा ही स्वायत्त आहेत. जे स्वायत्त आहेत त्यामध्ये अँटी डिफेक्शशन लॉ आहे. घटनेनं केलेली व्यवस्था ही मान्य केली पाहिजे. यामध्ये कोर्टाची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळतेय. अपात्र आमदार हा विधानसभेत सोडवला जाईल”, अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली.

“UAPA घटनाबाह्य आहे असं माझ्या पक्षकाराचं म्हणणं आहे. आता ज्या काही कारवाई सुरू आहेत या सगळ्यांना कोणतंही ज्युरीडीक्शन नाही. केंद्राचे अॅटर्नी जनरल यांना पार्टी करायला सांगितलं आहे. पुढच्या महिन्यात हे फायनल सुनावणीसाठी येईल. 14 तारखेपासून शिवसेना VS शिवसेना केस सुरू होण्याची शक्यता आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“घटनेमधल्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला नाही. काही जजमेंट मान्य करतात, काही नाही. एखादं राष्ट्र सार्वभौम आहे असं म्हणतो तर घटनेमध्ये दोन ठिकाणी असणारी व्यवस्था केली आहे. विधानसभा आणि लोकसभा सार्वभौम केलं आहे”, असं ते म्हणाले.

“सुप्रीम कोर्ट सार्वभौम आहे तसं लोकसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्षही सार्वभौम आहेत. एकमेकांसमोर झुकत नाही. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे’, असं मत त्यांनी मांडलं.

“मोहिंदर सिंग VS इलेक्शन कमिशन यामध्ये कोर्टात पिटीशन दाखल करण्यात आलं होतं. न्यायिक अधिकार इलेक्शन कमिशनकडे नाहीत. हे या केसचा दाखला आहे. आयोगाला अधिकार देऊन वाद निर्माण करायचा आहे का?”, असा सवाल त्यांनी केला.

“परिच्छेद 4 मध्ये फुटणाऱ्या आमदाराला त्यांनीही कंडीशन घातल्या आहेत. 2/3 असतील तर मर्ज व्हा किंवा नवीन पक्ष घेऊन मर्ज व्हा. 10 शेड्युलमध्ये कुठेही पक्ष फुटीला स्थान नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“जो काय निर्णय येईल माझं असं म्हणणं आहे की, आतापर्यंतचे निर्णय बेकायदेशीर आहेत. निवडणूक आयोगाला अधिकार नाहीत”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“सुप्रीम कोर्टातील, निवडणूक आयोगातील सुनावणी बेकायदेशीर आहे. 10 शेड्युलचा निर्णय हा अध्यक्षांकडे होऊ शकतो. तो कोर्टात होऊ शकत नाही. अध्यक्षांकडे याचा निर्णय होऊ शकतो. त्याला तपासण्याचा अधिकार कोर्टाकडे नाही. नोटीसीला स्टे ऑर्डर दिली आहे. अपात्रतेची नोटीस काढली होती”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.