रत्नागिरी-बारसू रिफायनरी; कोयनेतून पाणी आणण्यासंदर्भात ही अपडेट समोर

| Updated on: Dec 19, 2023 | 10:19 AM

Ratnagiri-Barsu Refinery | रत्नागिरी-बारसू रिफायनरीच्या वादाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आता या रिफायनरीला पाणी पुरवठ्यासाठीच्या सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. जीओ इन्फो कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या कामात कंपनीने आघाडी घेतली आहे. कोयनेतील पाणी या प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे.

रत्नागिरी-बारसू रिफायनरी; कोयनेतून पाणी आणण्यासंदर्भात ही अपडेट समोर
Follow us on

मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी | 19 डिसेंबर 2023 : रत्नागिरी-बारसू रिफायनरीच्या घोषणेपासूनच वादाचे समीकरण जोडल्या गेले आहे. आता या रिफायनरीच्या पाईप लाईन सर्वेक्षणाबाबत महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. रत्नागिरी- बारसू रिफायनरीसाठी पाईप लाईन सर्वेक्षणाचे काम 65 टक्के पूर्ण झाले आहे. कोयना अवजलाचे पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. 160 किलोमीटरच्या पाईप लाईनच्या जागेची पहाणी पूर्ण झाली आहे. आता पुढील कामही प्रगतीपथावर आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात हा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

सहा महिन्यांपासून सर्वेक्षण

गेल्या सहा महिन्यांपासून जीओ इन्फो कंपनीकडून प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. 160 किलोमीटर पैकी 90 टक्के पाईप लाईन महामार्गाजवळून जाणार आहे. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर अशा तालुक्यातून पाईप लाईन जाणार आहे. बारसू रिफायनरीसाठी कोयनेचे अवजल पाणी वापरले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

इतका आहे खर्च

बारसू रिफायनरीसाठी कोयना धरणातून पाणी आणण्यात येईल. त्यासाठी 1 कोटी 90 लाख खर्च करून सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. कोयनतून 67.50 टिएमसी पाणी थेट समुद्राला मिळते. कोयना अवजलातून वाया जाणारे 7.50 टीएमसी पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येईल. गुरुत्वाकर्षणाने वर्षाला 7.5 टीएमसी पाणी पुरवठा करता येईल का या संदर्भातील सर्व्हेक्षण आघाडीवर आहे.

समुद्रालगत तेल शुद्धीकरण प्रकल्प

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात हा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरीमधील राजापूरपासून 13 किलोमीटरवरील बारसू गावाची निवड करण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यापासून हे अंतर 15 किलोमीटर आहे. वेस्ट कोस्ट रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रोजेक्ट असे त्याचे नाव आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या तर सौदी अरामको आणि अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनी या दोन परदेशी कंपन्या यांची यामध्ये 50:50 टक्के भागीदारी आहे.

असा आहे प्रकल्प

हा प्रकल्प अगोदर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमध्ये करण्याचे नियोजन होते. त्यासाठी 14,000 एकर जागा ताब्यात घेण्यात येणार होती. पण स्थानिकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर हा प्रकल्प 15 किलोमीटर अंतरावरील बारसू येथे हलविण्यात आला. प्रकल्पाची क्षमता कमी करण्यात आली. 6,2,00 एकर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. याप्रकल्पाला पण विरोध सुरु आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात माती परीक्षणाला विरोध करण्यात आला होता. तळकोकणातील हा प्रकल्प वादात असला तरी त्यासंदर्भातील सर्वेक्षणाची कामे प्रगतीपथावर आहेत.