सांगलीः सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील बलगवडे ग्रामपंचायतने (Balgavade Grampanchayat) आजच्या मासिक सभेमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला आहे. याबाबतची माहिती सरपंच जयश्री हरिराम पाटील यांनी दिली असून असा ठराव करणारी बलगवडे ही सांगली जिल्ह्यातील (Sangli District) पहिली तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे. शुक्रवार (ता.20) मे रोजीच्या सभेमध्ये ग्रामसेवक विजयकुमार पाटील यांनी 17 मे रोजीचा विधवा प्रथेविरुद्धचा (Vidhava Pratha) शासन निर्णय वाचून दाखवण्यात आला. त्यावचर्चा होऊन ग्रामपंचायत सदस्य मिनाताई प्रकाश पाटील यांनी ठराव मांडला. त्या ठरावाला ग्रामपंचायत सदस्य सारिका सोमनाथ बुधावले यांच्याकडून अनुमोदन देण्यात आले.
सर्वसहमतीने ठराव मंजूर करण्यात आला. याअगोदर असा सुधारणावादी ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, अकोला जिल्ह्यातील ढोरखेड ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत.
समाजात आजही विधवा महिलांना सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये मान दिला जात नाही. भारतीय राज्यघटनेनुसार महिलांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार 17 मे रोजी महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार बलगवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा ठराव सर्व सहमतीने मंजूर केला आहे.
या ठरावामध्ये गावामध्ये व राज्यामध्ये तसेच देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे या करिता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. यासंदर्भात महिला सहभागातून गावामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यातील पहिल्यांदा बलगवडे ग्रामपंचायतनीने हा ठराव मंजूर करावा यासाठी गावचे नेते अनिल पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी उपसरपंच श्रीकांत मोहिते, माजी उपसरपंच उद्धव शिंदे, सदस्य धनाजी शिंदे, महादेव माळी, सुवर्णा शिवाजी शिंदे, सचिन रघुनाथ पाटील, माजी सरपंच सुर्यकांत थोरात, अजित जाधव उपस्थित होते.
हा सुधारणावादी, पुरोगामी ठराव मंजूर केलेबद्दल या गावचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सर्व सदस्यांचे पुस्तके व पुष्पगुच्छ अभिनंदन केले.