‘कर्तृत्व शून्य, त्यांची लक्तरे आता वेशीवर…’, राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका

| Updated on: Sep 07, 2023 | 3:42 PM

मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलेलं आहे. असं असताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

कर्तृत्व शून्य, त्यांची लक्तरे आता वेशीवर..., राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका
Follow us on

सोलापूर | 7 ऑगस्ट 2023 : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार इतके वर्ष सत्तेत राहिले, जाणता राजा म्हणून फिरले. मात्र आरक्षणासाठी कधी प्रयत्न केलेले ऐकिवात नाही. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार मुख्यमंत्री असताना तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं? याची श्वेतपत्रिका राज्य सरकार काढणार आहे. त्यावेळेस मराठा बांधवांना खरं कळेल. आता तुम्ही जालन्यातील आंदोलनस्थळी जाऊन भाषणे देता. तुमच्या काळात तुम्ही मराठा बांधवांचे एवढे नुकसान केले आहे की, तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, असा घणाघात विखे पाटलांनी केला.

“कर्तृत्व शून्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार होते. त्यांची लक्तरे आता वेशीवर टांगली जातील. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही समाज बांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना काय प्रयत्न केले? केंद्रात मंत्री असताना काय प्रयत्न केले? महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून काय प्रयत्न केले? हे लोकांना कळू द्या”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

‘जरांगे पाटलांनी विषय ताणू नये’

“कुणबी मराठा आरक्षणा संदर्भात कालच मुख्यमंत्र्यांनी धोरण स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील सर्व गावं ही निजाम संस्थामध्ये होती. त्यासाठी महसूल सचिवांच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली आहे. ज्यांच्याकडे कुणबी मराठ्याचे पुरावे आहेत त्यांना दाखले देण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटलांची मुख्य हीच मागणी होती. आमची ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका आहे. जरांगे पाटलांची प्रमुख मागणी पूर्ण केली आहे. जरांगे पाटलांना विनंती आहे, त्यांनी जास्त विषय ताणू नये”, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं.

“आमच्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकलं ते महाविकास आघाडीने घालवलं. तीच लोकं आज उपोषणस्थळी जाऊन भाषण देत आहेत. आमची भूमिका त्यावेळेस तीच होती आजही तीच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. मराठा बांधवांनी सांगितले आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यावे, ही पहिली भूमिका होती आणि ती आजही आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.