जोपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाची बिलं देत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात पाय ठेवायचं नाही: शरद कोळींचा मंत्री तानाजी सावंतांना इशारा

| Updated on: Aug 10, 2022 | 5:37 PM

शरद कोळी यांनी बंडखोर आमदारांवर टीका करत त्यांना ते म्हणाले की, इथून पुढे माझ्या सर्व गद्दारांना सांगणं आहे की तुम्ही आमदार होण्यासाठी मातोश्री समोर नाक घासले. घरात आपल्याला भाऊ सांभाळणं होत नाही पण मातोश्रीने, बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला चाळीस पन्नास वर्षे सांभाळले. त्याची तरी तुम्हाला जाण असायला हवी होती असा जोरदार हल्ला बंडखोर आमदारांवर त्यांनी चढवला.

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाची बिलं देत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात पाय ठेवायचं नाही: शरद कोळींचा मंत्री तानाजी सावंतांना इशारा
Follow us on

सोलापूर : जोपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाची बिलं दिली जात नाहीत तोपर्यंत तानाजी सावंतांना (Minister Tanaji Sawant) जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी शरद कोळी (Shivsena Leader Sharad Koli) यांनी कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत आणि आमदार शहाजी बापू पाटील यांना खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेल्या शरद कोळी यांनी नुकताच नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्री तानाजी सावंत आणि आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांना आव्हान देण्यात आले आहे. या त्यांच्या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलं देण्यात आली नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी शरद कोळी यांनी तानाजी सावंत यांना पाय ठेऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी असलेले शरद कोळी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे मात्र याच तानाजी सावंतानी शेतकऱ्यांना बारा बैलाचा चावऱ्या नांगर लावलाय अशी जहरी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.

बिलं दिल्याशिवाय पाय ठेवायचं नाही

यावेळी शरद कोळी म्हणाले की गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांना उसाची बिलं मिळाली नाहीत, त्यामुळे तानाजी सावंतांनी शेतकऱ्यांच्या उसाची बिलं दिली पाहिजेत अन्यथा सावंतांचा पैशाचा माज आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाची बिलं दिली जात नाहीत तोपर्यंत तुम्ही जिल्ह्यात पाय ठेवायचा नाही. जर तुम्ही जिल्ह्यात आला तर तुम्हाला पाय ठेवू देणार नाही असंही त्यांना सुनावण्यात आलं आहे.

शहाजी पाटलांची औकात काय?

मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका करताना शरद कोळी यांनी राज्यातील बंडखोरी नाट्यानंतर आणि ज्यांचा फोन कॉल व्हायरल झाला होता त्या शहाजी बापू पाटील यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली. यावेळी शरद कोळी म्हणाले की, शहाजी बापू पाटलाची काय औकात आहे हे जिल्ह्यातल्या सर्वांना माहिती आहे असही त्यांनी यावेळी सांगितले.

काय त्यांचं थोबाड

काय ते शहाजी बापू, काय त्याचं बोलणं, काय त्यांचं थोबाड, काय त्यांचं माव्याने भरलेलं तोंड शेजारी बसलेल्या माणसाला उलट्या होत्यात अशा माणसाचं तुम्ही काय घेऊन बसला आहात अशी जोरदार टीकाही शहाजी पाटलांवर करण्यात आली आहे.

मातोश्री समोर नाक घासले

यावेळी शरद कोळी यांनी बंडखोर आमदारांवर टीका करत त्यांना ते म्हणाले की, इथून पुढे माझ्या सर्व गद्दारांना सांगणं आहे की तुम्ही आमदार होण्यासाठी मातोश्री समोर नाक घासले. घरात आपल्याला भाऊ सांभाळणं होत नाही पण मातोश्रीने, बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला चाळीस पन्नास वर्षे सांभाळले. त्याची तरी तुम्हाला जाण असायला हवी होती असा जोरदार हल्ला बंडखोर आमदारांवर त्यांनी चढवला. त्यामुळे या सर्व गोष्टी विसरून तुम्ही यापुढे जर उद्धव साहेबांना काही बोलाल तर तुम्हाला तशाच भाषेत उत्तर मिळेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे

शरद कोळी यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची टीका होत असते. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्यावर तडीपारीची कोणतीही कारवाई झालेली नाही. माझ्यावर तडीपारीची नोटीस निघाली होती मात्र ती उच्च न्यायालयाने ती एका दिवसात रिजेक्ट केली आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या मुलाला प्रस्थापित नेत्यांकडून बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे मात्र या मंत्रिमंडळात काल शपथ घेतलेल्या किती लोकांवर गुन्हे आहेत त्याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. खंडणी, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे.