मुंबई : “त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन”… 2020 मधील सुपरहिट राजकीय डायलॉग्सची यादी काढली, तर हा संवाद पहिल्या पाचात आल्याशिवाय राहणार नाही. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा हात धरताना दिलेला हा इशारा. ईडीची एबी’सीडी’ काढायला गेलं, तर सरलेल्या वर्षात भल्याभल्या दिग्गजांना ईडीने नोटिशीतून आवताण धाडलं होतं. वर्षअखेरीस सरनाईक कुटुंब, एकनाथ खडसे, मिसेस संजय राऊत म्हणजेच वर्षा राऊत, रत्नाकर गुट्टे यांना ईडीने समन्स बजावलं. भाजपशी वाकड्यात शिरल्याने ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा ससेमिरा मागे लावल्याचा आरोप प्रत्येक वेळी झाला. या आरोप तथ्य किती होतं, याचा हिशोब काळच करेल. तूर्तास, सरत्या वर्षातील ईडीच्या एबीसीडीवर स्पेशल रिपोर्ट (Special Report on Maharashtra Political Leaders who received ED Notice)
एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतु कोरोनाची लागण झाल्यामुळे खडसे क्वारंटाईन झाले. “माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस आहे. यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु” असं सांगत खडसेंनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना नोटीस बजावल्याची जोरदार चर्चा आहे. जळगावमधील कथित बीएचआर घोटाळा त्यांनी बाहेर काढल्याने भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोटाळ्यावर कारवाई होण्याआधीच खडसेंवर ईडीची कारवाई करुन त्यांना अडचणीत आणलं जाऊ शकतं. एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तूर्तास त्यांची ईडी चौकशी पुढे ढकलली गेली आहे. परंतु हजेरीची टांगती तलवार कायम आहे.
खडसेंनी भाजपमध्ये असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले होते. आता राष्ट्रवादी प्रवेशानंतर समर्थक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना फोडून ते भाजपला मोठं खिंडार पाडण्याची भाजपला भीती असावी. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यास खडसे सक्षम असल्याचं मानलं जातं, त्यामुळेच खडसेंचा मेरु रोखण्यासाठी भाजपने ईडीचे शस्त्र उगारल्याचीही चर्चा आहे.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने 24 नोव्हेंबर 2020 रोजी छापे मारले होते. सरनाईक हे शिवसेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते आणि आमदार म्हणून ओळखले जातात. विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते. टॉप सिक्युरिटी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी हे छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक यांनाही नोटिसा आल्या.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने सरकारवर सोडलेल्या टीकास्त्रानंतर प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातही सरनाईकांनी भाजपला लक्ष्य केले होते. अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठपुरावाही केला. यातूनच सरनाईकांच्या मागे ईडीची पीडा लावल्याची टीका शिवसेनेने केली होती. (Special Report on Maharashtra Political Leaders who received ED Notice)
रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयावर ईडीची धाड पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शेतकरी आणि इतर उद्योगांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी गुट्टेंची अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ही मालमत्ता ईडीने जप्त केली. रत्नाकर गुट्टेंची गंगाखेड शुगर्सची 225 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
गुट्टे हे खरं तर भाजपचे सहयोगी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर गुट्टे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चाही रंगली होती. आठवड्याभरातच त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली. त्यामुळे गुट्टे अडचणीत आल्याचंही बोललं जातं.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती.
गेल्या दीड महिन्यापासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती, कागदपत्रं हवी आहेत. ती कागदपत्रे आम्ही वेळोवेळी पुरवली. पण गेल्या तीन महिन्यात त्यांनी काहीही शंका व्यक्त केली नाही. गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे, अशी बोचरी टीका राऊतांनी त्यानंतर केली.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत संजय राऊत यांचा मोलाचा वाटा होता. तेव्हापासूनच राऊतांनी भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. कंगना रनौत प्रकरण असो वा अर्णब गोस्वामी, राऊतांची तोफ कायमच धडाडत राहिली. त्यामुळे संजय राऊतांच्या मागे शुक्लकाष्ठ लावल्याचीही उघड चर्चा आहे.
संबंधित बातम्या :
ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर आत्ता नाही तर काँग्रेसच्या काळात झाला : देवेंद्र फडणवीस
वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर
(Special Report on Maharashtra Political Leaders who received ED Notice)