ठाणे : अंबरनाथच्या अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने शालेय पोषण अभियान अंतर्गत शासकीय कामांसाठी मोबाईल देण्यात आले. मात्र, हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे त्रस्त झालेल्या संपूर्ण अंबरनाथ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरीत्या मोबाईल वापसी आंदोलन केले.
शासनाच्या वतीने पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना 2019 मध्ये शासकीय कामकाज करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते. या मोबाईलमध्ये लाभार्थ्यांची नावं, हजेरी, वजन-उंची, तक्ता तसंच गर्भवती महिलांची माहिती, पोषण आहाराचं वाटप या सर्वाबाबत सविस्तर माहिती भरण्यात येते. मात्र या मोबाईलची क्षमता कमी असल्याने माहिती भरताना मोबाईल वारंवार हँग होणं, मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर तो प्रमाणापेक्षा जास्त गरम होणं अशा अनेक अडचणी अंगणवाडी सेविकांना काम करताना येतात.
शासनाने पुरवलेले हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. हे मोबाईल रिपेअरिंगला नेले असता त्यासाठी 2-3 हजार रुपयांचा खर्च सांगितला जात आहे. हा खर्च अल्प मानधनात काम करणाऱ्या या अंगणवाडी सेविकांना झेपणाराही नाही. शासनानं दिलेलं पोषण ट्रॅकर ॲप मोबाईलमध्ये रॅम कमी असल्याने डाऊनलोड होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना ते आपल्या घरगुती वापरातील मोबाईलमध्ये डाऊनलोड करावं लागत आहे.
विशेष म्हणजे अल्पशिक्षण घेतलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी शासनाने पुरवलेलं पोषण ट्रॅकर ॲप इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे अनेक सेविकांना इतरांची मदत घ्यावी लागते. मात्र हे काम दैनंदिन स्वरूपाचं असल्यानं रोज इतर व्यक्तींकडून मदत घेणंही शक्य होत नाही. तसंच या ॲपमध्ये डिलिटचा पर्यायच नाही. वर्गवारी किंवा लाभार्थींचे गट बदलणे, दैनंदिन करण्याची कामे इत्यादी सेवांबाबत कोणतेही मार्गदर्शन नाही. ही सर्व प्रक्रिया अतिशय किचकट आहे. त्यामुळेच अंबरनाथ तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरित्या आंदोलन करत शासनाने दिलेले हे मोबाईल परत केलेत.
Anganwadi worker return smartphone due to bad quality of mobile in Ambarnath Thane