Global Warming: समुद्राची वाढती पातळी मारिन ड्राईव्हला करू शकते गिळंकृत, येत्या आठ वर्षात काय असेल मुंबईची परिस्थिती?

| Updated on: Dec 01, 2022 | 2:10 PM

जागतिक हवामान बदलाचा परिणाम समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांना लवकरच अनुभवाला लागणार आहे. येत्या काही वर्षात काय परिस्थिती असेल जाणून घेऊया.

Global Warming: समुद्राची वाढती पातळी मारिन ड्राईव्हला करू शकते गिळंकृत, येत्या आठ वर्षात काय असेल मुंबईची परिस्थिती?
मारिन ड्राइव्ह
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  येणाऱ्या दिवसात हवामान बदलाचे (Global Warming) परिणाम झपाट्याने अनुभवायला मिळणार आहे.  पुढील आठ वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत मुंबई (Mumbai), कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरमचा किनारी भाग संकुचित होईल तसेच समुद्राचे पाणी जमीन गिळंकृत करेल. इतकेच नाही तर काही लोकांना त्यांची घरं आणि व्यवसाय सोडावे लागतील. राहण्याची जागा बदलावी लागेल.  2050 पर्यंत या शहरांची स्थिती बिकट होईल. समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा (Sea Level) मुंबईतील किमान 1000 इमारतींना फटका बसणार आहे. किमान 25 किमी लांबीचा रस्ता खराब होईल. जेव्हा भरती येईल तेव्हा 2490 इमारती आणि 126 किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली जाईल. आरएमएसआयने (RSMI Report) या वर्षी जुलैमध्ये एक अभ्यास केला होता. त्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

हाजी अली दर्गा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे याची परिस्थिती काय असेल?

ज्यामध्ये हाजी अली दर्गा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी लिंक, मरीन ड्राईव्हवरील क्वीन्स नेकलेस, हे सर्व बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतील, असे म्हटले होते. RMSI ने IPCC च्या सहाव्या हवामान मूल्यांकन अहवालातून हे विश्लेषण केले आहे. अशी स्थिती केवळ मुंबईतच होणार नाही तर कोची, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरमलाही वाढत्या समुद्र पातळीचा फटका सहन करावा लागणार आहे. आयपीसीसीने दिलेला इशारा वेगळा आहे.

हे सुद्धा वाचा

पृथ्वी मंत्रालयाच्या अहवालानुसार, 1874-2004 दरम्यान उत्तर हिंद महासागर दरवर्षी 1.06 ते 1.75 मिमी दराने वाढत होता. परंतु 1993 ते 2017 या काळात ते प्रतिवर्षी 3.3 मिमीच्या दराने वाढत आहे. जर तुम्ही 1874 ते 2005 पर्यंत पाहिले तर हिंदी महासागर जवळपास एक फूट वाढला आहे. जागतिक तापमानवाढ हे समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचे कारण असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास वादळेही वाढतील. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळांची संख्या गेल्या चार वर्षांत 52 टक्क्यांनी वाढली आहे.

सन 2100 पर्यंत ही 12 शहरे तीन फूट पाण्याने भरली जातील

सन 2100 पर्यंत भारतातील 12 किनारी शहरे सुमारे 3 फूट पाण्याखाली जातील. हा अभ्यास अमेरिकन अंतराळ संस्था नासाचा आहे. नासाने सी लेव्हल प्रोजेक्शन टूल तयार केले आहे. हे साधन IPCC अहवालात दिलेल्या माहितीनुसार कार्य करते. या अहवालात संपूर्ण जगाला उष्णतेचा तडाखा बसणार असल्याचे म्हटले आहे. कारण तापमान ४.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. पुढील दोन दशकांत तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल. तापमान इतके वाढले की हिमनद्या वितळणे साहजिकच आहे. त्याचे पाणी मैदानी आणि समुद्राच्या भागात विनाश आणेल.

नासाच्या प्रोजेक्शन टूलमध्ये बनविण्यात आलेल्या जगाचा नकाशामध्ये  कोणत्या वर्षी जगाच्या कोणत्या भागात समुद्राची पातळी किती वाढेल हे दर्शविण्यात आले आहे. पुढील काही दशकांत संपूर्ण जगात पाण्याची वाढती पातळी मोजण्यासाठी नासाने प्रथमच नवीन उपकरण तयार केले आहे. हे उपकरण जगातील ज्या देशांना किनारे आहेत त्यांची समुद्र पातळी मोजू शकते. सन 2100 पर्यंत भारतातील 12 शहरे अर्ध्या ते तीन फुटांपर्यंत समुद्राच्या पाण्यात बुडलेली असेल. यामागे वाढते तापमान कारणीभूत आहे.