Presidential Election : ममतांच्या बैठकीतून 5 पक्ष गायब, राष्ट्रपतीपद उमेदवारीबाबत 17 पक्षाचं मंथन; फारुक अब्दुलांच्या नावाची चर्चा, जाणून घ्या सर्व अपडेट्स

| Updated on: Jun 15, 2022 | 8:15 PM

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात सर्व प्रमुख विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात 17 विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रपतीच्या उमेदवारीचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिलीय.

Presidential Election : ममतांच्या बैठकीतून 5 पक्ष गायब, राष्ट्रपतीपद उमेदवारीबाबत 17 पक्षाचं मंथन; फारुक अब्दुलांच्या नावाची चर्चा, जाणून घ्या सर्व अपडेट्स
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत विरोधी पक्षांची बैठक
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : देशात राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे (Presidential Election) वारे वाहत आहेत. आज राजधानी दिल्लीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वात सर्व प्रमुख विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात 17 विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपतीच्या उमेदवारीचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिलीय. या बैठकीत एनडीएच्या उमेदवाराविरोधात विरोधी पक्षनेत्यांचा उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पण महत्वाची बाब म्हणजे या बैठकीतून प्रमुख 5 पक्ष गायब असल्याचं पाहायला मिळालं. या 10 मुद्द्यातून राष्ट्रपती निवडणुकीबाबत आतापर्यंत काय काय झालं जाणून घेऊया.

  1. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 9 जून रोजी राष्ट्रपती पदाबाबतच्या निवडणूक प्रक्रियेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 29 जून ही उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. निवडणूक बिनविरोध झाली नाही तर 18 जुलैला मतदान आणि 21 जुलैला मतमोजणी होईल.
  2. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेची घोषणा केल्यानंतर 11 जून रोजी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना बैठकीसाठी आमंत्रित केलं. यात ममता यांनी काँग्रेससह डावे पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रमुखांसह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलं.
  3. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु करण्यात आली. पण शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आपण नसल्याचं जाहीर केलं.
  4. राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीचं निमंत्रण काँग्रेसनं स्वीकारलं. त्यासाठी काँग्रेसकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय प्रतिनिधी मंडळाची घोषणा केली.
  5. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतता बॅनर्जी यांच्या बोलावलेल्या बैठकीचं निमंत्रण आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवण्यात आलं. मात्र, बुधवारी सकाळी आपने बैठकीत सहभागी होणं टाळल्याचं पाहायला मिळालं.
  6. ममता बॅनर्जी यांनी या बैठकीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनाही निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तिसरा पर्याय देण्याच्या प्रयत्नात असलेले केसीआर या बैठकीपासून दूर राहिले.
  7. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी आयोजित विरोधकांच्या बैठकीत गोपाल कृष्ण यांच्या नावावर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावेळी त्यांच्याशी संपर्कही साधण्यात आला.
  8. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीपासून AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसीदेखील दूर राहिले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आपल्याला बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.
  9. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 22 राजकीय पक्षांना निमंत्रण पाठवलं होतं. या बैठकीत 17 राजकीय पक्षांनी सहभाग घेतला. तर एकूण 5 राजकीय पक्ष बैठकीपासून दूर राहिले.
  10. या बैठकीत 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देण्यावर एकमत बनलं. शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर उमेदवार म्हणून फारुक अब्दुल्ला यांच्या नावाची चर्चा झाली.

शरद पवारांना नाकारला विरोधी पक्षांचा प्रस्ताव

राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, शरद पवार यांनी तो नम्रपणे नाकारला. त्याबाबतचं ट्वीट पवार यांनी केलंय. दिल्लीत झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझं नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. पण नम्रपणे सांगतो की मी माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सेवा सुरु ठेवण्यात मला आनंद आहे.