Aurangabad | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिलाच औरंगाबाद दौरा, 1200 पोलिसांचे सुरक्षा कवच!

| Updated on: Jul 30, 2022 | 9:29 AM

मुख्यमंत्र्यांचा दौरा शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील राजकीय नेते आणि नागरिकांकडून सहकार्य मिळेल अशी, अपेक्षा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.

Aurangabad | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिलाच औरंगाबाद दौरा, 1200 पोलिसांचे सुरक्षा कवच!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: PTI
Follow us on

औरंगाबादः मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रथमच औरंगाबादमध्ये (Aurangabad visit) येत आहेत. औरंगाबादमधून शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. शिंदेंच्या मेळाव्यात शिवसैनिकांची गर्दी पाहण्यासारखी असेल, असे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी जवळपास 1200 पोलीस कर्मचारी तैनात असतील. यात 50 अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री औरंगाबादेत येतील. रविवारी दिवसभर त्यांचे ठिकठिकाणी भेटी-गाठी आणि मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत, त्या स्थळी आणि मार्गावर आज सकाळपासूनच बंदोबस्ताची तालमी करण्यात येणार आहे.

एका दिवसात अनेक कार्यक्रम

मुख्यमंत्री एकाच दिवसासाठी औरंगाबादेत येत असले तरीही या वेळेत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, संदिपान भूमरे यांच्या कार्यालयांना भेट देणार आहेत. या मार्गावरील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवानदन करतील. तसेच शहरातील गुरुद्वाऱ्यालाही भेट देतील. त्यामुळे या ठिकाणाच्या प्रत्येक मार्गावर पोलीस तैनात असतील. या दौऱ्यात वैजापूर आणि सिल्लोडमधील मेळाव्यात मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.

एमआयएम काळे झेंडे दाखवणार

दरम्यान, औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यावरून शहरातील मुस्लिम नागरिक तसेच काही पक्षांची नाराजी आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या महाविकास आघाडी तसेच शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आधीच निषेध व्यक्त केला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याने एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह खा. जलील मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार आहेत. यावेळी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संभाजीनगर नामांतराचा निषेध करतील, असा इशारा खा. जलील यांनी दिला आहे.

पोलीस आयुक्त काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी औरंगाबाद शहरातील पोलीस दल सज्ज असून हा दौरा शांततेत पार पडेल. विरोधकांना निषेध व्यक्त करण्याचा अधिकार असतो. मात्र मुख्यमंत्री हे संविधानिक पद आहे. त्यामुळे कोणत्याही बेकायदेशीर मार्गाने त्यांना विरोध दर्शवणे अपेक्षित नाही. आम्ही सध्या कुणालाही नोटीसा दिलेल्या नाहीत. शहरातील राजकीय नेते आणि नागरिकांकडून सहकार्य मिळेल अशी, अपेक्षा असल्याचं पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितलं.