रवी राणा की बच्चू कडू? खोके कुणी घेतले? मुख्यमंत्र्यांचे नाव घेत एकनाथ खडसे यांचा मोठा दावा
बच्चू कडू आणि रवी राणा वादात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील उडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.
जळगाव : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. खोके कुणी घेतले? यावरुन सुरु असलेल्या या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चागलांच वादंग माजला आहे. राणा आणि कडू यांच्यातील वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. या वादामुळे विरोधकांना आयतेच कोलीत सापडले आहे. या वादात आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील उडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.
राज्यातील अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. बच्चू कडू यांनी त्याची सुरुवात केली असल्याचे खडसे म्हणाले. बच्चू कडू म्हणतात की, माझ्यासोबत सात ते आठ आमदार आहेत आणि आता सात आठ आमदार घेऊन ते बाहेर पडतात का हीच परिस्थिती शिंदे यांच्यासह असलेल्या 50 60 आमदारांची असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही त्यामुळे अनेक आमदार अस्वस्थ आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार न झालेले अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यापैकीच एक बच्चू कडू पण आहेत.
बच्चू कडू यांचे मंत्रिमंडळामध्ये नाव आहे. बच्चू कडू यांच्याबरोबर आणखी सुद्धा आमदार येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज ही खडसे यांनी व्यक्त केला आहे.
बच्चू कडू की रवी राणा यांच्यापैकी खोके कुणी घेतले याचे उत्तर एकनाथ शिंदे देऊ शकतात असे म्हणत खडसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.