मुंबई : शिंदे गट आणि शिवसेना (Shiv Sena) दोघांकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याबाबत निवडणूक आयोग (Election Commission) निर्णय घेणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक अथॉरिटी आहे. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. जो काही निर्णय निवडणूक आयोगाचा असेल त्याप्रमाणे पुढचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. सोबतच आमची बाजू सत्याची आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वासही दीपक केसरक यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी उद्धव ठाकरे यांनी बोललेल्या गोष्टीवर कधीही टीका करत नाही, मात्र कालच्या त्यांनी केलेल्या भाषणामुळे अस्वस्थ झालो असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होती हे सांगताना त्यांनी बेकीसीवर शिवाजी पार्कच्या तुलनेत तिप्पट गर्दी होती असं म्हटलं आहे. सर्वसामान्य लोकाचं आणि शिवसैनिकांच मुख्यमंत्र्यांवर प्रेम असल्याचंही यावेळी केसरकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून सुरू असलेल्या टीकेला मी पत्रकार परिषदेत उत्तर देणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. मी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.