मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) शिंदे सरकार फार काळ टिकणार नाही, मध्यावधी निवडणुका लागतील अशी भविष्यवाणी केली. त्यानंतर भाजपकडून त्यांच्या या विधानावर टीका होतेय. भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी “पवार बोलतात त्याच्याविरूद्ध घडतं, आमचं सरकार पुढची दशकानुदशके टिकेल”, असा विश्वास व्यक्त केला. तर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक ट्विट करत आपला विरोध दर्शवला आहे. “साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची चर्चा होतेय. तर पवारांचं मत योग्य आहे, राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असं महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत.
भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्विट करत शरद पवारांच्या विधानाला आपला विरोध दर्शवला आहे. “साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 4, 2022
सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता प्रवीण दरेकरांनी फेटाळली. शरद पवार जे बोलतात त्याच्या बरोबर उलट घडतं, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे पुढची काही दशकं हे सरकार काम करत राहिल, असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. पवार म्हणाले होते, की आमदार मुंबईत आल्यावर त्यांचं मतपरिवर्तन होईल. पण तसं काही झालं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला धक्का लागण्याची कोणतीही शक्यता नाही, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही मोठं विधान केलं आहे. एकंदर ज्या पद्धतीने सरकार बनले त्याची स्थिती पाहता हे चालणार आहे का हे तर वादाचे आहे. या सरकारवर शंका येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवावी लागेल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. थोरात यांच्या या विधानामुळे काँग्रेसही मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.