मुंबई : सध्या राज्यात राजकीय अस्थिरता आहे. निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलं आहे. भाजपसोबत जाण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. उद्धव ठाकरेंनी तर थेट एकनाथ शिंदेंनी सांगावं मी योग्य राज्य कारभार करत नाही मी आता राजीनामा देतो, असं म्हटलं. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळं ट्विट केलं आहे. “पक्षात या मगच सरकार स्थापन करू, भाजपची एकनाथ शिंदेंसमोर अट?”, असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपमध्या येण्याची अट टाकली आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. “एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022
आशिष जैस्वाल हेदेखील गुवाहाटीमध्ये दाखल दाखल झाले आहेत. 3 आमदारांसह ते गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. दहा वाजताच्या होणाऱ्या बैठकीतही ते असतील, अशी माहिती आहे. आशिष जैस्वाल हे शिवसेना पक्षप्रमुख यांचे निकटवर्तीय समजले जातात. कालपासून आशिष जैस्वाल हे नॉट रिचेबल होते. अखेर ते गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संध्याकाळी भावनिक भाषण केले. सत्तेचा मोह नाही, आजच वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडण्याची घोषणा त्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केली, आणि रात्री साडे नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वर्षा निवासस्थान सोडलं. ते वर्षावरुन निघताना त्यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना वर्षा निवासस्थानातून निघताना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.