मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गटात आतापर्यंत शिवसेनेतील नाराज आमदार, मंत्री हे सहभागी होत होते. पण आता (Maratha Kranti Morcha) मराठा क्रांती मार्चानेही या गटाला आपला पाठिंबा दर्शिवला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या समर्थनार्थांची संख्या वाढत आहे. मराठा क्रांती मार्चाने केलेले आंदोलन तसेच कोपर्डी प्रकरणी न्याय मागण्यासाठी केलेल्या आंदोलनाला एकनाथ शिंदे आणि (Tanaji Sawant) तानाजी सावंत यांनी केलेली मदत विसरता येणार नाही. शिवाय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटाचा लढा सुरु असल्याचे सांगत हा पाठिंबा देण्यात आला आहे. शिवाय भविष्यात मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत हे समर्थ असल्याची भावनाही मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी, मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे हे कायम मराठा तरुणांसाठी हक्काचे आमदार – मंत्री रहिले आहेत. त्यामुळे आज हिंदुत्वाची हक्काची लढाई एकनाथ शिंदे व तानाजी सावंत लढत असताना मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चा याबाबतीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील असे प्रतिपादन महेश डोंगरे यांनी केले आहे. हा पाठिंबा दर्शवण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आमदारांच्या वाढत्या पाठिंब्यानंतर आता संघटना देखील शिंदे गटाच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.
मराठा क्रांती मार्चाने केवळ शिंदे गटाला पाठिंबाच दिला नाही तर या गटाच्या संरक्षणाची जाबाबदारीही घेतली आहे. उद्या शिंदे गट हा राज्यात दाखल झाला तर त्यांच्या सुरक्षतेसाठी मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरणार आहे. मराठा क्रांती मोर्चा हा केवळ मूक मोर्चेच काढतो असे नाही तर वेळप्रसंगी शिंदे गटासाठी संरक्षण कवच दिले जाणार असल्याचे महेश डोंगरे यांनी सांगितले आहे.
एकीकडे शिंदे गटाला मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा दिला असला तरी दुसरीकडे संजय राऊतांना मात्र, हे वागणं बरे नव्हे असाच सल्ला दिला आहे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत असलेल्या आमदारांना जीव मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप कऱण्यात आला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा शांतपणे हा घटनाक्रम बघत बसेल असे जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या मागे आता मराठा क्रांती मोर्चाही असणार आहे.