यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने संविधानाला मुद्दा बनवलं आहे. भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशाच संविधान बदलणार असा प्रचार इंडिया आघाडीकडून केला जातोय. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलण्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं. आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संविधान बदलण्याच्या मुद्यावर भाष्य केलं. लातूरमध्ये आलेले आदित्य ठाकेर म्हणाले की, ‘भाजपाला संविधान कशासाठी बदलायच आहे?’ असा सवाल त्यांनी केला.
“भाजपाचे मोठे नेते पंकजा मुंडेंपासून 400 पारचा नारा देतायत. ते असं का बोलतायत? 400 पार का करायचय? संविधान बदलायचय म्हणून. संविधान का बदलता? आपण वेगवेगळे कायदे करत असतो, संविधान बदलण देशासाठी धोकादायक आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “गुंड सध्या मंत्रालयात जाऊन रील बनवतात. त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
संविधान बदलण्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस काय म्हणालेले?
भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल पत्रकार परिषदेत संविधान बदलण्याच्या मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान होतं, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. एनडीएचा प्रमुख म्हणून मोदींची निवड झाली, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम संविधानाची पूजा केली. त्यानंतर पद स्वीकारलं. कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाच असल्याच त्यांनी म्हटलं. मागची दहावर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी संविधानाच रक्षण केलं. संविधान बदलण्याचा विचार केला नाही”