आपलं सरकार येणार, राष्ट्रवादीच्या आमदारांना उद्धव ठाकरेंची हमी

| Updated on: Nov 24, 2019 | 4:41 PM

हॉटेले रेनेसाँमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातही बंद दाराआड काही वेळ गुप्त चर्चा झाली.

आपलं सरकार येणार, राष्ट्रवादीच्या आमदारांना उद्धव ठाकरेंची हमी
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘हॉटेल रेनेसाँ’मध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. आपलंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास आमदारांना देण्याचा प्रयत्न यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केला. उद्धव ठाकरे आणि पवार यांच्यातही बंद दाराआड (Uddhav Thackeray with NCP MLA) काहीवेळ गुप्त चर्चा झाली.

सुप्रीम कोर्टातील उद्याच्या सुनावणीपर्यंत राष्ट्रवादीचे सर्व आमदार ‘हॉटेल रेनेसाँ’मध्येच राहण्याची शक्यता आहे. ‘आपलंच सरकार स्थापन होईल. काळजी करु नका. विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला बैठकीत नेत्यांनी आमदारांना दिला.

राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे ‘हॉटेल ललित’ला रवाना झाले. या ठिकाणी ते शिवसेना आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. अखेरीस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची एकत्र बैठक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदार ‘जे. डब्ल्यू मॅरिएट’मध्ये वास्तव्याला आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं लक्ष आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील वाटचालीबाबत निर्णय होणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत तशी चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याशी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि दोन्ही पक्षाचे नेते वेगळी चर्चा करत होते. अजित पवार यांच्या बंडानंतर काही काळ संपर्काबाहेर असलेल्या धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत दोन्ही पक्षाचे नेते साशंक असल्याचं म्हटलं जातं.

अजित पवार रेनेसाँ हॉटेलमधल्या बैठकीला येतील अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आशा होती. अजित पवार यांच्या मनधरणीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरु होते. परंतु ही आशाही फोल ठरली.

बंडानंतर अजित पवारांचे 10 मिनिटांत 16 ट्विट

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. परंतु अजित पवार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे दोन्ही नेत्यांना रिकाम्या हाती  परतावं लागलं.

अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संख्याबळ दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना भुलवून त्यांनी राजभवनावर नेल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात (Uddhav Thackeray with NCP MLA ) आली.