जम्मू : निसर्गसौंदर्य, थंड हवा आणि बर्फाळ प्रदेश म्हणून ओळख असलेला जम्मू काश्मीर प्रदेश अनेक कारणांनी ओळखला जातो. येथील वास्तू, संस्कृती कित्येकांना भुरळ घालते. मात्र, दुसरीकडे येथील दहशतवाद, बॉम्बहल्ले हे सत्यसुद्धा न विसरण्याजोगे आहे. याच दहशतवादामुळे श्रीनगरच्या हब्बा कदल भागात असलेले शितलनाथ मंदिर मागील 30 वर्षांपासून बंद होते. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर या मंदिराचे दरवाजे पुन्हा नव्याने उघडण्यात आले. जम्मू काश्मीरमधील पवित्र मंदिरांपैकी एक अशी ओळख असलेल्या या मंदिराला खुलं करताच येथे भक्तांनी रांगा लावल्या. (shital nath temple of srinagar opened after 30 years)
इतिहासकारानुसार 90 च्या दशकात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद वाढला. त्यामुळे येथे हिंसाचारात वाढ झाली. वाढता नरसंहार आणि अशांतता बघून हे मंदीर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शितलनाथ मंदिराला शीतलेश्वर मंदिर म्हणूनही ओळखला जातं. हे मंदिर काश्मीर खोऱ्यातील सर्वांत पवित्र मंदिरांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. या मंदिराचे द्वार पश्चिम दिशेला असून काश्मीर खोऱ्यातील हिंदूसाठी हे मंदीर श्रद्धास्थान असल्याचे म्हटले जाते. असं म्हटलं जातं की हे मंदीर तब्बल 2 हजार वर्षे जुने आहे. याविषयी निवृत्त प्रोफेसर डॉक्टर त्रिलोकी नाथ गंजू यांनी सविस्तर लिहलेले आहे.
काश्मीरमधील इतिहासकारांनुसार या भागात जेव्हा अफगान शासकांचे राज्य होते. त्या काळात या मंदिराला नष्ट करण्यात आलं. 1990 मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करुन या मंदिरातील कुंड नष्ट केले. या घटनेमुळे हब्बा कदल भागात संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती.
हे मंदिर देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे साक्षीदार राहिलेले आहे. असं म्हटलं जातं की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहर लाल नेहरु स्वातंत्र्यसेनानी खान अब्दुल गफार खान आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी या बड्या व्यक्तींनी या मंदिराच्या आवारात उभं राहून येथील जनतेला संबोधित केलेले आहे. येथे अनेक प्रकारचे कार्यक्रम व्हायचे. त्यामुळे हे मंदिर म्हणजे खुलेपणाने बोलण्यासाठीचे ठिकाण होते, असे इतिहासकारांनी म्हटलेलं आहे.
दरम्यान हे मंदिर आता सर्वांसाठी खुले झाल्यामुळे येथील भक्तांना आनंद झाला आहे. मंदिराचे दरवाजे खुले होताच अनेक भक्तांनी येथे दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
इतर बातम्या :
(shital nath temple of srinagar opened after 30 years)