Devshayani Ekadashi 2022 : देवशयनी एकादशीला देव खरोखरच निद्रा घेतात?; काय आहे आख्यायिका?

असं म्हटलं जातं की देवशयनी एकादशीला (Devshayani Ekadashi) श्रीविष्णू चार महिन्यांसाठी निद्रा घेण्यास जातात आणि देवउठनी एकादशीला ते जागे होतात. या आख्यायिकेमागे नेमकं खरं काय कारण आहे ? जाणून घेऊया.

Devshayani Ekadashi 2022 : देवशयनी एकादशीला देव खरोखरच निद्रा घेतात?; काय आहे आख्यायिका?
Devshayani Ekadashi
Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 1:25 PM

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) म्हटले जाते. देवशयनी एकादशी शास्त्रात अतिशय महत्वाची मानली जाते. असं म्हटलं जातं की, या दिवशी जगाचे पालनहार श्रीविष्णू चार महिन्यांसाठी निद्रा घेण्यास जातात. तर शंकर (Lord Shiva) हे चार महिने जगाचा कार्यभार सांभाळण्यास सिद्ध होतात. देवांच्या निद्रेमुळे या एकादशीला देवशयनी एकादशी आणि हरिशयनी एकादशी म्हटले जाते. हरि शयनाच्या चार महिन्यांच्या निद्राकाळास चातुर्मास (Chaturmas) संबोधले जाते. चातुर्मासात विशेष पूजा पाठ केले जातात, मात्र या काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य असते. कार्तिक महिन्यात देवउठनी एकादशीच्या दिवशी श्रीविष्णू निद्रेतून जागे होतात, त्याच दिवशी मंगल कार्यांची सुरूवात होते. यावर्षी 10 जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. मात्र देवशयनी एकादशीला देव खरंच निद्रा घेतात की यामागे आणखी काही कारणे आहेत ? जाणून घेऊया.

देवशयन आणि देव जागरणाचं महत्त्व

चैतन्याच्या पातळीवर जागृत असलेल्यांना ईश्वर म्हटलं जातं, असं ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्र म्हणतात. जर चैत्यन्य अवस्थेत जागृत असलेल्यांना ईश्वर मानलं जातं तर मग देव दीर्घ काळासाठी निद्रा कशी घेऊ शकतात? खरे पाहता देवशयन आणि देव जागरण हे ऋषी मुनींनी सर्वसामान्य लोकांसाठी तयार केलेली एक व्यवस्था आहे. सामान्य लोक धर्माशी जोडले जावेत आणि त्यांचं आयुष्य सुकर व्हावं हा त्यामागचा हेतू होता. देवशयनी एकादशीपासून ते देवउठनी एकादशीपर्यंतच्या काळात वातावरण बदलतं. अशावेळी या काळात मांगलिक कार्यांनाही शुभ समजून काही नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.

यासाठी बनवले नियम

देवशयनी एकादशी आषाढ महिन्यात असते. त्यानंतर काहीच दिवसात श्रावणास प्रारंभ होतो. श्रावण महिना (Sawan Month) हा पावसाचा महिना असतो. पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतुचे आगमन होते. म्हणजेच चातुर्मासात ऋतूत बदल होत असतात. ऋतुबदलानुसार आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार पसरतात. सर्व भाज्या, फळे यांमध्ये बॅक्टेरिया आणि किड लागते. पावसामुळे सामान्य जनजीवन थोडे विस्कळीत होते आणि गृहकेंद्रित होते. या सर्व कारणांमुळेच या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य करत नाहीत, खाण्या-पिण्याची काळजी घेण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

या काळात काय करावे?

– या चार महिन्यात मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी देवाची आराधना करावी, चिंतन करावे.

– तळलेले, दुग्धजन्य, डेअरीतील पदार्थांचे सेवन करणे टाळावे. पचायला हलका, सात्विक आहार घ्यावा. केवळ एक वेळेस जेवणे उत्तम.

– चातुर्मासादरम्यान पावसाळा असतो. भाज्यांना कीड लागू शकते. त्यामुळे वांगी, कोबी, मुळा आणि हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे.

– रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगासने आणि प्राणायम करावा.

– पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते, त्यामुळे कोणतीही शुभ कार्य करू नयेत.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)