आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी अनेक संघांनी टीममध्ये बदल केले. एकूण 3 संघांनी आपले कर्णधार बदलले. तडकाफडकी कॅप्टन बदलण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. त्यामुळे आता या 17 व्या हंगामात अपवाद वगळता सर्वच युवा कर्णधार आहेत. तसेच या हंगामाआधी एका सुवर्ण युगाचा अंतही झाला आहे. त्यामुळे एका बाजूला हळहळ व्यक्त केली जातेय. तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंना संधी मिळाल्याने आनंदही व्यक्त केला जातोय. या निमित्ताने आपण 17 व्या हंगामाआधी कोणत्या संघाने कर्णधार बदलले? तसेच सर्वात या मोसमातील अनुभवी कॅप्टन कोण? हे आपण जाणून घेऊयात.
विराट कोहली याने काही मोसमांआधीच नेतृत्व सोडलं होतं. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याच्याकडे असलेलं कर्णधारपद काढून ते हार्दिक पंड्या याला देण्यात आलं. तर 17 व्या सिजनच्या पूर्वसंध्येला चेन्नई सुपर किंग्सने चाहत्यांच्या काळजाला हात घालत कॅप्टन बदलला. महेंद्रसिंह धोनी याच्याकडे असलेल्या कॅप्टन्सीची जबाबदारी पुणेकर ऋतुराज गायकवाड याला देण्यात आली. तर सनरायजर्स हैदरबादाने एडन मारक्रमचा पत्ता कट करत ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता पॅट कमिन्स याच्याकडे धुरा सोपवली.
मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सच्या हार्दिक पंड्या याला ट्रेड करत आपल्याकडे घेतलं. त्यामुळे आता शुबमन गिल याला गुजरातची कॅप्टन्सी मिळालीय. दुखापतीनंतर श्रेयस अय्यर याची एन्ट्री झालीय. त्यामुळे केकेआरची जबाबदारी श्रेयसने पुन्हा एकदा घेतलीय. तर नितीश राणा याला उपकर्णधार पदावर समाधान मानावं लागणार आहे.
रस्ते अपघातानंतर ऋषभ पंत परतलाय. आता पंत दिल्ली कॅपिट्ल्सचे सूत्रं सांभाळणार आहे.डेव्हिड वॉर्नर याने 16 व्या हंगामात दिल्लीचं नेतृत्व केलेलं. तसेच लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुल हा देखील दुखापतीनंतर परतला आहे. कृणाल पंड्या याने केएलच्या अनुपस्थितीत गेल्या हंगामात नेतृत्व केलं होतं.
तर 3 संघांनी आपल्या कर्णधारांवर विश्वास दाखवत त्यांना कायम ठेवलंय. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस हाच असणार आहे. संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. तर शिखर धवन पंजाब किंग्संच कर्णधारपद सांभाळणार आहे.
श्रेयस अय्यर याचंही दुखापतीनंतर कमबॅक झालंय. श्रेयस अय्यर हा 17 व्या हंगामातील इतर 9 जणांच्या तुलनेत अनुभवी कर्णधार आहे. श्रेयस अय्यर याने आयपीएलमध्ये 101 सामने खेळले आहेत. श्रेयसने 101 डावांमध्ये 31.55 च्या सरासरी आणि 125.38 च्या स्ट्राईर रेटने 2 हजार 776 धावा केल्या आहेत. तसेच श्रेयसची 96 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. श्रेयसला 55 सामन्यांमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे.